लोकसभा जागांबाबत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी, नेते म्हणाले ‘भाजपला महागात पडेल’…

राज्यात शिवसेना भाजप युती आणि महाविकास आघाडीला तिसरा पर्याय म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष समोर येत आहे. लोकसभा निवडणुकांची तयारी हा पक्ष करत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.

लोकसभा जागांबाबत या पक्षाने घेतली आघाडी, नेते म्हणाले भाजपला महागात पडेल...
LEADERS OF MAHAVIKAS AGHADI
| Updated on: Jun 28, 2023 | 2:32 PM

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ), भाजप यांच्या युतीचा सामना थेट महाविकास आघाडीतील घटकपक्षांची होणार आहे. युती आणि आघाडी दोन्हीमध्ये जागावाटपावरुन धुसफूस सुरु आहे. तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही महाराष्ट्रात जोरदार शक्तीप्रदर्शन नवा पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. राव यांनी दोन दिवस त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेत राज्यात पाय रोवण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांच्यात जागावाटपाची चढाओढ सुरु असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा जागांबाबत महत्वाचं विधान केलंय.

काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक संपन्न झाली. त्यांनतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली. राज्यात शिंदे फडणवीस यांच्या काळात बिहार उत्तरप्रदेशसारखे जंगलराज झाले आहे अशी टीका त्यांनी केली.

राज्यात पाऊस उशिरा पडला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु. आवश्यकता भासल्यास राज्यपालांकडे जाऊ असा इशाराही त्यांनी दिला.

पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले. त्यामुळे खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले? असा सवाल त्यांनी केला.

रस्त्यावर उतरू

राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार गंभीर नाही. आम्ही राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांना भेटून यासंदर्भात अवगत केले आहे. काँग्रेस या प्रश्नाबाबत गंभीर आहे. त्यामुळे मागेपुढे वेळ आलीच तर या प्रश्नावरून आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.

ती टीका भाजपला महागात पडेल

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भाजपा मुळ मुद्द्यांपासून पळ काढत आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई यावर काय त्याचे उत्तर भाजपाकडे नाही. यासाठीच हास्यकल्लोळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जनता त्यांच्या हास्यकल्लोळला ओळखून आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. ही टीका भाजपाला महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला

लोकसभा जागांबाबतचा निर्णय ६ तारखेला

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी 15 ते 20 जागासंदर्भात चर्चा झाली. मात्र, पूर्ण चर्चा झाली नाही. येत्या 6 जुलै रोजी आणखी एक बैठक होणार आहे. काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. तसेच, अधिवेशनाआधी आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करु, असे त्यांनी सांगितले.