कसला तो थर्ड क्लास भिकारडा, त्रिवेदीला बाहेर काढा नाही तर…; उदयनराजे संतापले

काय पण बोलायच, कुणाबद्दल पण बोलायच त्याला भाजपाचा पाठिंबा नाही. हे राजकारण होतंय. पाठबळ कुणी देत नाही. राज्यपालला इथे नाही, कुठे ही ठेवू नका. वय झालं, विस्मरण होतयं.

कसला तो थर्ड क्लास भिकारडा, त्रिवेदीला बाहेर काढा नाही तर...; उदयनराजे संतापले
कसला तो थर्ड क्लास भिकारडा, त्रिवेदीला बाहेर काढा नाही तर...; उदयनराजे संतापले
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 21, 2022 | 12:55 PM

वसई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अनादर आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची केलेली बदनामी यामुळे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले आहेत. कसला तो थर्ड क्लास भिकारडा. त्या त्रिवेदीला बाहेर काढा. नाही तर मी माझ्या पद्धतीने बघून घेईल. त्यांची जीभ कशी हासडायची हे मला माहीत आहे, असा संतप्त इशाराच उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. मीडियाशी संबोधित करताना उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये भाजपवरच हल्लाबोल केला आहे.

नालासोपारा मराठा उद्योजक लॉबीच्या पाचव्या वर्धापन दिनाचा काल कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यापालाच पद सन्मानाच पद आहे. त्यांना आपण काय बोलावं हे कळायला पाहिजे. त्यांनी एकदा नव्हे दोनदा विधान केलं, याकडे उदनराजे यांनी लक्ष वेधलं.

सुधांशु त्रिवेदी यांच्यावर त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. कुठला तो थर्डक्लास भिकारडा. अशा लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलायचं? राज्यपाल असो किंवा त्रिवेदी या दोघांनीही माफी मागायला हवी. सर्वात आधी त्यांना पदावरून हाकला. अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल हे मी त्यावेळी सांगेल, असा इशारा त्यांनी दिला.

ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढणं गरजेच आहे. आपल्या शरीराला गँगरीन झाल्यावर आपण शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी आणि राज्यपालांना फेकून दिलं पाहिजे, अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

ज्यांनी आपलं सर्व आयुष्य समाजासाठी अर्पित केलं, त्या माणसाबद्दल बोलताना लायकी नसणाऱ्यांनी शिंतोडे उडवू नये. जनतेने अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे. मग कुणीही असो, असंही ते म्हणाले. त्रिवेदीला चप्पलेने मारलं पाहिजे. त्रिवेदी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी चोपून काढा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

काय पण बोलायच, कुणाबद्दल पण बोलायच त्याला भाजपाचा पाठिंबा नाही. हे राजकारण होतंय. पाठबळ कुणी देत नाही. राज्यपालला इथे नाही, कुठे ही ठेवू नका. वय झालं, विस्मरण होतयं. काय बोलतोय ते त्यांना कळत नाही. घरी जावू द्या, नाहीतर वृध्दाश्रमात जावू द्या. त्रिवेदीला पहिलं बाहेर काढा. नाहीतर मी माझ्या पद्धतीने बघेल, असा इशाराही त्यांनी दिला.

देशाला एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपतींचा विचार ठेवावा लागेल. अन्यथा भविष्यात देशाचे तुकडे होतील. महाराजांबद्दल असे वक्तव्य करणाची हकालपट्टी करणं शासनाला जमत नसेल तर यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, असा निर्णायक इशाराही त्यांनी दिला.

Follow Us