Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मैत्रीभावनेने एकत्रं यावं; शहाजीबापूंचं आवाहन

| Updated on: Aug 07, 2022 | 11:17 AM

Shahajibapu Patil : शिंदे साहेब दिल्लीला जात आहे. केंद्रासोबत सुसंवाद असायला हवा. त्यासाठी दिल्लीत जावं लागतं. राज्याला गतिमानता देण्यासाठी ते वारंवार दिल्लीत जात आहेत, असंही ते म्हणाले.

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मैत्रीभावनेने एकत्रं यावं; शहाजीबापूंचं आवाहन
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मैत्रीभावनेने एकत्रं यावं; शहाजीबापूंचं आवाहन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं असलं तरी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि एकनाथ शिंदे यांनी अजूनही एकत्रं यावं अशी भावना या आमदारांची आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली आहे. आज मैत्री दिन आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आजच्या दिवशी मैत्रीभावनेतून एकत्रं यावं. या दोघांनी मिळून शिवसेना वाढीस न्यावी. शिवसेनेची भरभराट व्हावी. ही माझीच नाही तर प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची, आमदार आणि खासदारांचीही अपेक्षा आहे. भगवंताच्या कृपेने हे घडून यावं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं आवाहन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले. शहाजीबापू पाटील मीडियाशी संवाद साधत होते.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोणतीही निवडणूक लागल्यावर सर्वच पक्ष निकाल लागेपर्यंत आपआपले दावे करत असतात. आदित्य ठाकरेंनी दावा केल्यावर भाजपचे आशिष शेलारही तसाच दावा करतील. शिंदे गटाचे लोकही दावा करतील. पण निकाल लागल्यावर वास्तव कळेल, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

दोन चार दिवसात सुरळीत होईल

एक महिना उलटून गेला तरी अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या बाबत मी बोलणं उचित नाही. दोन चार दिवसात हे सर्व सुकर होईल. सरकार सुरळीतपणे काम करेल, असं ते म्हणाले. हे सरकार दोन लोकांवर चालत नाही. मुख्यमंत्री शिंदे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. त्यानंतर राज्याचा गाडा मार्गी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपालांकडून चुका झाल्या

राज्यपालांविषयी एखादी कमेंट देणं हे सुद्धा गैर आहे. कारण त्यांच्या पदाला संविधानात वेगळं महत्त्व आहे. राज्यपालांकडून काही चुकाही झाल्या आहेत. मलाही वाटतं. मुंबईविषयीचं त्यांचं विधान राज्यातील जनतेला खटकणारं होतं. अनावधनाने बोललो याची कबुलीही त्यांनी दिली. पण एखाद्या प्रश्नाच्या मागे पळत सुटल्याने जनतेचे प्रश्न सुटणार नाही. शेतकरी आणि जनतेची प्रश्न वेगळे आहेत. शेतकरी संकटात आहेत. त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

धनुष्यबाण आम्हालाच मिळेल

धनुष्यबाणाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. शिंदे साहेब दिल्लीला जात आहे. केंद्रासोबत सुसंवाद असायला हवा. त्यासाठी दिल्लीत जावं लागतं. राज्याला गतिमानता देण्यासाठी ते वारंवार दिल्लीत जात आहेत, असंही ते म्हणाले. केंद्र आणि राज्य एकाच विचाराचे असले तर राज्याचा विकास होतो, असा दावाही त्यांनी केला.