तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच, फडतूस नाही म्हणायचे तर काय?; दैनिक ‘सामना’तून सवाल

| Updated on: Apr 06, 2023 | 7:21 AM

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. या दोघांवरही फडतूस, काडतूस आणि नपुंसक या मुद्यावरून टीका करण्यात आली आहे.

तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच, फडतूस नाही म्हणायचे तर काय?; दैनिक सामनातून सवाल
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : फडतूस आणि नपुंसक या दोन शब्दांवरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आजच्या अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सर्वाधिक हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच तुम्ही सर्व एकजात पाद्रे पावटेच आहात. भाजपच्या चवन्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? असा सवाल करत ‘सामना’च्या अग्रलेखातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता भाजप त्यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस काडतूस असतील किंवा आणखी काही. पण महाराष्ट्रावर एक फडतूस राज्य करत आहे. त्यांनी महाराष्ट्राची सर्वच स्तरावर अप्रतिष्ठा करण्याचा विडाच उचलला आहे. राज्य सरकार किंवा ते चालवणारे हे फडतूस आहेत ही लोकांचीच भावना नसून कोर्टालाही तसेच वाटत आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक सरकार असं म्हटलं आहे, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तुमची फुकटची फौजदारी दिल्लीच्या जोरावर आहे. उद्या हे औटघटकेचं राज्यही जाईल आणि फुकट फौजदारी करणाऱ्यांना जनता बरखास्तही करेल, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

थयथयाट करण्याचं कारण काय?

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नपुंसक म्हटलं आहे. त्यावर बावन आण्यांनी एवढा थयथयाट करण्याची गरज काय? नपुंसक किंवा फडतूस या शब्दांचा अर्थ बावन आण्यांनी समजून घेतला पाहिजे. बिनकामाचा याचा अर्थच फडतूस असा आहे. शब्दकोषात तसं म्हटलं आहे. त्यामुळेच हे टोकदार सत्य फडतूस सरकारच्या काळजात घुसले आहे, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा पडला आहे अन् ही भिजलेली काडतुसे आपल्याच मस्तीत दंग आहेत. शेतकरी ठिकठिकाणी आत्महत्या करत आहेत. मंत्रालयातसमोर तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण भिजलेल्या काडतुसांना त्याची चिंता नाही. त्यामुळे आता आपण फडतूस आहोत की भिजलेले काडतूस आहोत हे तुम्हीच ठरवा, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

साहेब, किधर घुसेंगे?

फडणवीस म्हणतात मी काडतूस आहे… हम घुसेंगे… आम्ही म्हणतो साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा. तिकडे चीन अरुणाचलमध्ये आतमध्ये घुसला आहे. त्या चीनचे काय करणार आहात? चीनचे जे काडतूस घुसले आहे ते तुमच्या त्या बावन आण्यांना काढायला सांगा. केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसेल तर तुमचे कर्तृत्व तरी काय? तुम्ही तुमच्या पायावर तरी उभे राहाल का? तुमच्या काडतुसांची दारू ही केंद्रीय यंत्रणांची आहे. नाही तर तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच आहात, असा हल्लाबोलही करण्यात आला आहे.