MIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण, बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

| Updated on: Sep 28, 2020 | 2:20 PM

एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, हा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

MIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण, बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार
Follow us on

मुंबई : देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युतीने केली होती, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. (Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar hints alliance for Bihar Elections)

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला, भविष्यात असा प्रयत्न परत करु. जे महाराष्ट्रात घडलं नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, हा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लिम बांधवांना माझे सांगणे आहे की याबाबत विचार करा, आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पाडू. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

‘वंचित’चा नवा प्रयोग

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगातून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी रणनीती बदलली आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याऐवजी आता आघाडी, युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केल्यानंतर आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.

”बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुका देशाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असं आम्हाला वाटतं. सर्व मिळून जर बिहारमधील एनडीएचं सरकार पाडलं तर केंद्रातील मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं, असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे आंबेडकरांचा आघाडीच्या राजकारणाचा निर्णय केवळ बिहारपुरताच मर्यादित आहे की महाराष्ट्रातही हाच प्रयोग राबवला जाणार आहे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संबंधित बातम्या:

Bihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता ‘स्वबळा’ऐवजी ‘आघाडी’चं राजकारण

‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…

(Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar hints alliance for Bihar Elections)