Video: नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले, तुला चीफ एडिटर व्हावं वाटत नाही का?

| Updated on: Jun 14, 2021 | 6:52 PM

नाना पटोले यांनी अकोल्यात बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छाही बोलून दाखवली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

Video: नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले, तुला चीफ एडिटर व्हावं वाटत नाही का?
उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us on

कोल्हापूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी जोमाने एकसोबत लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुर्चार केलाय. इतकंच नाही तर नाना पटोले यांनी अकोल्यात बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छाही बोलून दाखवली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. (Ajit Pawar’s reply to Nana Patole’s statement on Chief Minister’s post)

स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाही. आमची आघाडी असली तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. काँग्रेसनं कुणाबरोबर निवडणुका लढवाव्या किंवा काय हा अधिकार सोनिया गांधींचा आहे. राष्ट्रवादीने कुणाबरोबर आघाडी करावी न करावी हा अधिकार पवार साहेबांचा आहे. तसा शिवसेनेचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यावेळी पत्रकारांनी नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याबाबतही प्रश्न विचारला. त्यावेळी तू ज्या चॅनेलमध्ये काम करतो तिथं तुला मुख्य संपादक व्हावं असं तुला वाटत नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. अजितदादांच्या या उत्तरामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये चांगलाच हशा पिकला.

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही – पटोले

नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसंच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं म्हणाले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. आता यासर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं.

नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एक ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहेत. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री”

पाच वर्ष मुख्यमंत्री कोण?

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या :

नानाभौ कसे मुख्यमंत्री होणार? काँग्रेसचा स्वबळाचा नारा किती वास्तववादी?; वाचा सविस्तर

नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?

Ajit Pawar’s reply to Nana Patole’s statement on Chief Minister’s post, laughter among journalists