मुंबई: उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात पाल्हाळिक बोलण्यापलीकडे काय केले, असा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात काय केले हे सांगावे. तुम्ही पाल्हाळिक बोलणे बंद करा. तुम्हाला कोरोना रोखता आला नाही, याची कबुली द्यावी. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही, अशी टीका पडळकर यांनी केली. (BJP leader Gopichand Padalkar slams CM Uddhav Thackeray)
ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोल होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांनी लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवून घाबरवणे बंद करावे. मुख्यमंत्री काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करण्यासाठी आहेत का? मुख्यमंत्र्यांनी खुर्चा सोडून रस्त्यावर उतरले पाहिजे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला आहे. राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. इतर राज्यांनीही पॅकेज जाहीर केलं. पण या सरकारने काहीच केलं नाही. उलट लोकांची वीज कापली आणि लोकांना त्रास दिला. कोविड काळात लोकांना त्रास देणारं हे एकमेव सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्र्यांचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; फडणवीसांचा टोला
‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध
(BJP leader Gopichand Padalkar slams CM Uddhav Thackeray)