काकींच्या प्रचार सभेला का गेलो नाही?, आमदार रोहित पवार म्हणाले, ‘आधीच सांगितलं होते…

अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत पोट निवडणूक होत आहे.२३ तारखेला मतदान आहे. त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार उपस्थित नव्हते. त्याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काकींच्या प्रचार सभेला का गेलो नाही?, आमदार रोहित पवार म्हणाले, आधीच सांगितलं होते...
sunetra pawar and rohit pawar
| Updated on: Apr 21, 2026 | 10:38 PM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आज बारामतीत झाली. या सभेला राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीचे नेतेही या सभेला आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू अजितदादांच्या आठवणीला उजाळा देत आपल्या दादांसाठी मतदान करा असे आवाहन बारामतीकरांना केले. या सभेला आमदार रोहित पवार अनुपस्थित होते. या विषयी येवला येथे रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली.

बारामतीच्या मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून मी स्वतः फिरलो. बारामतीकरांनी ठरवले आहे अजितदादांच्या कार्याकडे पाहून आणि प्रेमापोटी सुनेत्रा काकींना निवडून द्यायचे. मी यापूर्वी सांगितले आहे की अजितदादांच्या प्रेमाने आदरामुळे मी प्रचाराला तीन दिवस फिरलो. आपण सुनेत्रा काकींचा प्रचार दादांकडे बघून करत होतो. सुप्रियाताई काही दिवस दिल्लीला व्यस्त होत्या.मात्र आज आत्याला ( सुप्रिया ताई) त्यांचा फोन आला असावा म्हणून त्या स्टेजवर गेल्या. त्यांनी देखील महायुतीचा प्रचार केला नाही. केवळ सुनेत्रा काकींच्यावतीने त्या बोलल्या आणि मी आधीच सांगितले होते की मी महायुतीच्या व्यासपीठावर जाणार नाही असेही रोहित पवार यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याच्या संदर्भात अजितदादा असतानाही चर्चा झाली होती.आता तो विषय काही राहिला नाही. पवार साहेबांनी आम्हाला सांगितले आहे की महाराष्ट्रात काही लोकांच्या अडचणी आहेत. तुम्ही त्या सोडवण्यासाठी बाहेर फिरा असेही रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर सांगितले.

भाजपचे सरकार आल्यानंतर भोंदूगिरी वाढली आहे. त्याला आपण काय करणार ? भोंदूबाबा शून्यापासून सुरुवात करून दोन हजार कोटींचा मालक होतो, हे सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होणार नाही. प्रतिगामी आणि मनुवादी विचारामुळे भोंदूगिरी वाढली असे आपल्याला म्हणावे लागेल असेही एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले. भोंदूगिरी वाढली त्याला सरकारकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. नाशिकमध्ये जे प्रकरण घडले, त्यामध्ये 70 अधिकारी आणि महिलांचे व्हिडिओ आहेत. सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर आलेत. मग नेत्यांचे व्हिडिओ कुठे गेले.? महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण चालले आहे, ते कुठेतरी खोडून काढावे लागेल असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

रेपच्या केसमध्ये जेलमध्ये गेलेल्या आसाराम बाबांचे समर्थन काही लोक करतात. भागवत संप्रदायाला पुढे घेऊन जाणाऱ्या महाराजांचे समर्थन कोणी करत नाही.पाच पाच कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रात येणारे महाराज संत तुकाराम महाराजांबद्दल चुकीचे काही बोलले त्यावर कोणी काही बोलत. भोंदूगिरी महाराष्ट्रमध्ये वाढून वारकरी संप्रदाय संपला पाहिजे यासाठी भाजप प्रयत्न करत आहे असाही आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.

मतदार पुनर्रचना कायदा मारून मुटकून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार तुमचे असताना भाजप मुंबईमध्ये आंदोलन करत आहे. दोन – दोन तास मुंबईतील लोक खोळंबून बसले. आंदोलन करायचे असेल तर शेतकऱ्यांसाठी करा.शेतकऱ्यांच्या आणि सामान्य लोकांच्या अनेक समस्या आहेत त्यासाठी तुम्ही आंदोलन करा.वरतून आदेश आला की लागले आंदोलन करायला. आदेश आल्याशिवाय तुम्ही आंदोलन करत नाही अशी टीका रोहित पवार यांनी भाजपावर केली आहे.

आम्ही १० मे पर्यंत थांबू, त्यानंतर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार अपघात प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. यावर रोहित पवार म्हणाले की चांगली गोष्ट आहे, तुम्ही कारवाई तर करा. एक लाख मराठी कॉन्ट्रॅक्टर तुम्ही प्रलंबित ठेवता. व्ही.के. सिंग याला पैशावर पैसे महाराष्ट्र सरकार देत असेल. मात्र या प्रकरणात एक साधा एफआयआर दाखल केला जात नाही. सीबीआयची इन्क्वायरीची मागणी मी केली नव्हती ती सुनेत्रा काकींनी केली होती.मात्र, अजूनपर्यंत तपास काही झालेला नाही. तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त होता. आम्ही १० मे पर्यंत थांबू, त्यानंतर स्पष्ट आणि कडक भूमिका नक्कीच घेऊ असेही विमान अपघात तपासाबद्दल रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 

Follow Us