Vinod Tawde : भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडे सर्वात पुढे का? जाणून घ्या…

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे स्थान रिक्त झाले आहे. या पदाच्या शर्यतीत भाजपाचे अनेक नेते असले तर सर्वात पुढे विनोद तावडे आहेत. कारण तावडे यांनी त्यांच्यावर सोपविलेल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. तर पाहूयात तावडे यांचे पारडे जड का आहे?

Vinod Tawde : भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडे सर्वात पुढे का? जाणून घ्या...
Vinod Tawde
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 12, 2024 | 7:18 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकांत भाजपाला जोरदार फटका बसला आहे. दोन-दोन पक्ष फोडूनही भाजपाला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकांना सामोरे जाताना भाजपा नवीन धक्कातंत्राचा वापर करु शकते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना लोकसभेत उतरून आता थेट आरोग्य मंत्री केले आहे. त्यामुळे आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजपातील अंतर्गत निर्णय खूपच गुप्तपणे घेतले जात असल्याने ते सहसा बाहेर कोणाला समजत नाहीत. त्यामुळे या पदावर कोण येणार ? याचा केवळ राजकीय विश्लेषक अंदाज लावू शकतात. त्यामुळे या शर्यतीत कोण-कोण आहेत हे आधी पाहूयात…

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक भाजपा नेत्यांची नावे सामील आहेत. भाजपा नेते बी.एल. संतोष, सुनिल बन्सल, फग्गन सिंह कुलस्ते, केशव प्रसाद मौर्य आदींची नावे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. परंतू एक नाव विनोद तावडे यांचेही असून याच नावावर पक्षश्रेष्टी मोहोर लावतील असे म्हटले जात आहे. आता आपण पाहूयात विनोद तावडे यांचे पारडे का जड आहे. विनोद तावडे अभाविप पासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. त्यांनी सांस्कृतिक तसेच शालेय मंत्री म्हणून चांगली छाप पाडली होती. ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील होते. परंतू देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले. परंतू विनोद तावडे यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल अवाक्षरही न काढत शांत राहत पक्षांत संघटनात्मक काम करीत राहीले. त्यांच्या या श्रद्धा आणि सबुरीचे फळ त्यांना मिळाले. त्यांना पक्ष संघटनेत मोठे पद मिळाले. आता ते देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे ताकदवान नेते गृहमंत्री अमित शाह यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

विधानसभेत रोष शांत करण्यासाठी

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत. लोकसभा निवडणूकात भाजपाचे पानिपत झाले आहे. भाजपाला महाराष्ट्रात सपशेल अपयश आले आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातही मराठा आंदोलनाचा जोरदार फटका भाजपाला बसला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूका झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडून भाजपाच्या पदरी मोठे अपयश आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीची नौबतही देखील भाजपावर आली आहे. परंतू उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएत परततील याची कोणतीही गॅरंटी नाही. कारण ज्याप्रकार केंद्रीय संस्था, निवडणूक आयोगाचा वापर करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था केली ती पाहता सध्या तरी उद्धव ठाकरे एनडीएत परण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही.

मराठा असणे पथ्यावर पडणारे

भाजपाला लोकसभा निवडणूकीपूर्वी केलेल्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा काहीही उपयोग होणार नसल्याचा भाजपाला समजले होते. त्यामुळे आता या पक्ष तोडफोडीचा काही उपयोग झालेला नाही. महाराष्ट्रात दुखावलेल्या मराठा समाजाला खुष करण्यासाठी विनोद तावडे यांना भाजपाचे अध्यक्ष पद देऊ शकते असे म्हटले जात आहे. मराठा समाजाचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तसेच मराठा नेतृत्वाची महाराष्ट्रात भाजपाला आवश्यकता आहे. विनोद तावडे देखील मराठा समाजातील असल्याने त्याचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या शर्यतीत त्यांचे नाव सर्वात पुढे आहे. 2019 मध्ये बोरीवलीतून त्यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले त्यानंतर मिडीया प्रतिक्रीया देताना त्यांनी नो महाराष्ट्र, ओन्ली राष्ट्र असे म्हटले होते. त्यांनी दिल्लीत राहून चार वर्षे गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास जिंकला आहे. तसेच सध्या ते बिहार राज्याचे प्रभारी असून त्यांनी नितीशबाबूंना एनडीएकडे वळविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

तावडे मापदंड पूर्ण करणारे

भाजपाला अन्य राज्यात यश मिळाले नसताना बिहारात मात्र लालूच्या आरजेडीला रोखण्याचे काम विनोद तावडे यांनी केले. काही राज्यात सरकार बदलण्यात देखील तावडे यांनी महत्वाचा रोल निभावला आहे. त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, मिडीयाला हाताळण्याची हातोटी पाहून त्यांना पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो असे म्हटले जात आहे. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या सारख्या नेत्यांचे अकाली झालेले निधन त्यामुळे केंद्रात सर्वसमावेश चेहरा आणि नेतृत्वाची गरज असल्याने तावडे यांच्या गळ्यात भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ घालू शकते असे म्हटले जात आहे.