Eknath Shinde vs Uddhav Thackeray : उद्धव म्हणतात, मी तर खूर्ची सोडायला तयार! पण त्यावर शिंदे बसायला तयार? 5 शक्यता!
Eknath Shinde Latest News : उद्धव ठाकरेंना थेट शरद पवारांनीही (Sharad Pawar) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिलेलाय.
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde News) बंडावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली. मी खूर्ची सोडायला तयार आहे, तुम्ही मला फक्त सांगा, की उद्धव तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको, असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. आता बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला कशा प्रकारे साद घालतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता तर उद्धव ठाकरेंना थेट शरद पवारांनीही (Sharad Pawar) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिलेलाय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे खरंच महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्त्व करण्यासाठी पुढे येणार का? असा प्रश्न निर्माण झाला. याबाबतचं उत्तर नेमकं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी पाच शक्यता तपासून पाहणं गरजेचं आहे.
1. भाजपसोबत जाण्याची अट :
पहिल्या शक्यतेनुसार एकनाथ शिंदे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद घेण्याची फारशी शक्यता नाही. शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी त्यांनी प्रमुख अट आहे. या अटीवर त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार सोबत आलेले आहेत. असं असताना मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे महाविकास आघाडीचं पद स्वीकारतील, अशी शक्यता कमीच आहे. आत्तात नव्हे तर राज्यसभेसाठीच्या निवडणुकीतही भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव, एकनाथ शिंदे यांनी दिलेला होता. पण तो संजय राऊतांनी अमान्य केला, असंही सांगितलं जातंय. ही सल देखील एकनाथ शिंदेच्या मनात कायम असणार आहे. शिवाय भाजपकडून प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे बंड करताना झालेली मदत एकनाथ शिंदे दुर्लक्षित करुन महाविकास आघाडी सरकारमध्ये झाला-गेला राग विसरुन सामील होती, याच्या शक्यता अगदीच धुसर आहेत.
2. आदित्यसोबतचा वाद :
गेल्या वर्षभरापासून आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेले शिंदेंचे मतभेद आता उघड झाले. त्यांच्या खात्यावर लादण्याच आलेल्या बंधनांचा विषय असेल, किंवा त्यांचं खातंच आदित्य ठाकरेंना देण्याची कुजबूज असेल, एकनाथ शिंदेंजी नाराजी आणि अस्वस्थता कुणापासूनच लपून राहिलेली नव्हती. मुख्यमंत्रीपद जरी दिलं, तरी ठाकरेंना राज्य चालवताना विचारात घ्यावं लागणारच, याचीही कल्पना एकनाथ शिंदे यांना असणारच आहे.
शिवाय सेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची शिंदेंना उत्तरदायीत्व ठेवावं लागणार आहे. आता केलेल्या बंडखोरीनंतर तडजोडीचं सरकार स्थापन करुन त्याचं नेतृत्त्व करण्याची इच्छा एकनाथ शिंदेची असेल, अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आदित्यसोबतचा वाद आणि गेले वर्षभरापासून सुरु असलेली खदखद पाहता, शिवसेनेनं जरी ऑफर दिली, तर एकनाथ शिंदे यांच्याकडून ती स्वीकरली जाईलच, याची कोणतीही शाश्वती देता येत नाही.
3. गटनेतेपद काढल्याचा राग :
शिवसेनेनं एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांचे परतीचे दोर कापून टाकले होते. गटनेते पदावरुन शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना हटवलं. ही कारवाई अयोग्य होती, अशी खदखद त्यांनी बोलूनही दाखवली होती. गटनेते पदावरुन काढल्याचा राग एकनाथ शिंदे आला होताच. त्यानंतर संख्येचं गणित जुळवत एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता खरी शिवसेना आपल्यासोबत आहे, असं म्हटलं होतं.
आता त्यांनी पत्रव्यवहार करत सत्तेचं गणिताची जमवाजमाव करण्यासाठीची प्रक्रिया सुरुही केली आहे. पण शिवसेनेकडून एकनाथ शिंदेचं बंड थोपवण्याचे प्रयत्न अजूनही समोर आहेत. एकंदरीत बंडखोर शिवसेना आमदारांची रणनिती पाहता, ठाकरेंची सेना शिंदे टेक ओव्हर करण्याच्या मनसुब्यात असल्याचंच पाहायला मिळतंय.
4. हिंदुत्वाचा मुद्दा :
एकनाथ शिंदे बंडखोरी केल्याच्या पहिल्या ट्वीटपासून आनंद दिघेसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आम्हाला पुढे घेऊन जायचाय, असंही म्हणताय. हिंदुत्त्वाचा नारा त्यांनी दिला आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना भरडली गेल्याचंही त्यांनी म्हटलं.
घटक पक्ष मजबूत झाले आणि दुसरीकडे शिवसेनेचं खच्चीकरण झालं, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली, तरी ती स्वीकारणार नाही, हेही एकनाथ शिंदेंच्या भूमिकेतून स्पष्ट झालंय. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेलेत.
5. ईडीची भीती :
शिवसेनेच्या अनेक आमदार, नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी दबाव आणल्याचाही एक तर्क लढवला जातो. या दबावाला बळी पडल्यानं अनेक शिवसेना नेते आणि आमदार हे एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहिल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे या प्रमुख मागणीसाठीच शिवसेनेचे बहुतांश आमदार हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी इच्छुक असावेत, अशीही शंका घेतली जाते.
वाचा एकनाथ शिंदे यांचं ताजं ट्वीट :
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
वरील पाच शक्यतांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता अगदीच धुसर आहे. एकंदरीत संख्या बळ पाहता महाविकास आघाडी अल्पमतात आल्यानं त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली जाते का, हेही पाहणं महत्त्वाचंय. की ठाकरे सरकार वाचवण्यासोबत पक्ष वाचवण्यासाठी नेमकं काय करतात, हे देखील येत्या काळात स्पष्ट होणार आहे.