‘नियती आबांपेक्षा त्यांच्या आईशी क्रूर वागली’, आबांच्या सख्ख्या दोस्ताकडून आठवणींना उजाळा

| Updated on: Aug 16, 2021 | 3:34 PM

आबा गेल्याचं दु:ख व्यक्त करताना कवी इंद्रजित भालेराव म्हणतात, "मला राहून राहून वाटतं की नियती आबांपेक्षा त्यांच्या आईशी क्रूर वागली...!" (Memories of RR Patil by Poet Indrajit Bhalerao On his birth anniversary)

नियती आबांपेक्षा त्यांच्या आईशी क्रूर वागली, आबांच्या सख्ख्या दोस्ताकडून आठवणींना उजाळा
इंद्रजित भालेराव आणि आर आर पाटील
Follow us on

अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : आर. आर. आबांचे (RR Patil) अगदी जवळचे मित्र म्हणजे कवी इंद्रजित भालेराव (Indrajit Bhalerao)…. इंद्रजीत भालेराव शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते… त्यांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली, याचा रंजक किस्सा कवी इंद्रजित भालेराव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितला. ते म्हणाले “मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात आबांची आणि माझी पहिली भेट झाली. आबा त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याच कार्यक्रमात मी एक कविता म्हटलो… ‘शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक… निवडून दिलं त्याला पाडायला शिक, घेतलेलं कर्ज बुडवायला शिक…’ माझ्या कवितेवर टाळ्यांचा कडकडाट झाला… आबा सत्तापक्षात होते. त्यामुळे त्यांना ही कविता सरकारविरोधी वाटली… त्यांनी आपल्या भाषणात मिश्किलपणे म्हटलं, ही कविता विरोधी पक्षाची वाटते… पुढे बोलण्याच्या भरात त्यांनी मला नक्षलवादी म्हटलं…. मला जरा राग आला आणि वाईटही वाटलं…”

आबांनी घरी जाऊन भालेरावांची माफी मागितली!

“आमचे साताऱ्याचे मित्र यशवंत पाटणे यांच्याकडे बोलताना मी हा प्रसंग सांगितला…. त्यांनी तो आबांच्या कानावर घातला… संवेदनशील मनाच्या आबांनी मला लगेच फोन केला…. भालेराव साहेब मी मिश्किलपणे बोलून गेलो… मी दिलगिरी व्यक्त करतो… त्याबद्दल माफी मागतो, असं आबा फोनवर म्हणाले. पाचेक मिनिटे आमचं बोलणं झालं… पुढे काहीच दिवसांत त्यांचा परभणीला दौरा होता… या दौऱ्यावेळी त्यांनी मला सकाळी 8 वाजता फोन केला, मी तुमच्या घरी येतोय… सकाळी 10 च्या आसपास आबा घरी आले… चहा नाश्ता झाला.. गप्पा झाल्या.. यावेळीही आबांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली..”, अशा प्रकारे मैत्रीची सुरुवात झाल्याचं इंद्रजित भालेराव यांनी सांगितलं.

पुस्तकप्रेमी आबा

“आमची मैत्री पुढे वाढत गेली… पुढे दिवसेंदिवस घट्ट होत गेली… कारण दोन-तीन महिन्यांतून मुंबईत आबांच्या चित्रकूट बंगल्यावर आमच्या गप्पांच्या मैफिल रंगायच्या…. दिनकर पाटील, यशवंत पाटणे, अरुण शेवते, मी आणि आबा यांच्यात साहित्य संगीताविषयी छान चर्चा व्हायच्या… पुस्तकांविषयी विचारमंथन व्हायचं…., असं इंद्रजित भालेराव यांनी सांगितलं. आबांच्या पुस्तक प्रेमाविषयी भालेराव सांगतात, “आबांची चित्रकूट बंगल्यातील बेडरुम तीन माणसं झोपतील एवढी होती… पण आबांच्या बेडरुममध्ये पुस्तकंच पुस्तकं असायची… कपाटात तर होतीच, पण त्यांच्या बेडवरदेखील पुस्तकांचा संच असायचा… अगदी आबा झोपू शकतील, एवढीच बेडवर जागा, बाकी सगळा बेड पुस्तकांनी भरलेला…. एकदा त्यांना मी असाच प्रश्न विचारला की, आबा कपाटात ठीक आहे पण बेडवर पुस्तकं का?, तर त्यावर त्यांनी मला सांगितलं की संदर्भ शोधायला काही पुस्तकं मी हाताशी ठेवतो… त्यामुळे पुस्तकं शोधायला वेळ लागत नाही आणि संदर्भही लवकर मिळतो…”

“नियती आबांपेक्षा त्यांच्या आईशी क्रूर वागली…!”

आबांच्या पुस्तकं वाचण्याच्या सवयीमुळे त्यांचं भाषण आशयपूर्ण, वैशिष्टपूर्ण आणि संवेदनशील असायचं… लोकांच्या मनाचा ठाव घेणारं असायचं… ते पोटतिडकीने बोलायचे.. त्यांच्या बोलण्यात तळमळ असायची, संवेदनशीलता असायची… गरिबांबद्दल कणव असायची, असं कवी इंद्रजित भालेराव सांगतात. आबांनी आमची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत जपली… तिला खतपाणी घातलं.. राजकारणात आबांसारखा स्वच्छ चारित्र्याचा माणूस असणं हे विरळ होतं… आता अशी माणसं राजकारणात दिसणं दुर्मिळ झालंय, असं भालेराव सांगतात. आबा गेल्याचं दु:ख व्यक्त करताना भालेराव म्हणतात, “मला राहून राहून वाटतं की नियती आबांपेक्षा त्यांच्या आईशी क्रूर वागली…!”

आबांच्या व्यक्तीमत्त्वाने भारवलेल्या इंद्रजित भालेराव यांनी आबांवर एक कविता लिहिली. त्यातून आबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. कवी भालेराव लिहितात…..

धडका देऊन टिकून होता…. खडकावरचा कोंब आबा
नम्र निरागस गुणी आबा… ऋषी मुनींची धुनी आबा
शिवबाची तलवार आबा… फुलाहूनी अलवार आबा
सामन्यांचे सपान आबा… ताठ कण्यातील मीपण आबा
धरतीचे आकाश आबा… घन-तमात प्रकाश आबा!

(Memories of RR Patil by Poet Indrajit Bhalerao On his birth anniversary)

हे ही वाचा :

R R Patil जयंती विशेष : दहावीच्या परीक्षेत केंद्रात अव्वल, लाठ्या-काठ्याचा धाक दाखवणारं खातं माणसात आणलं, आबांचे 4 धडाकेबाज निर्णय

RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’, ‘भाऊ-आबांनी’ त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला!