
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीची पूजा देखील करण्यात येते. वारंवार कार्यात बाधा येणे, शिक्षणात अडथळे येणे अशा अनेक समस्यांसाठी वैभव लक्ष्मी व्रत (Vaibhav Lakshmi Vrat) करण्याचा सल्ला देण्यात येतो. जाणून घेऊया वैभवलक्ष्मी व्रत काय आहे आणि ते कसे करावे.
फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतात. हे व्रत आपल्या क्षमतेनुसार 11 किंवा 21 शुक्रवारी करता येते. त्यानंतर त्याची सांगता करण्यात येते.
साधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते. शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते. मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते. बहुतांश महिला या पुस्तकाच्या आधारे व्रत करतात. पहिल्या शुक्रवारपासून पुढील 11 किंवा 21 शुक्रवार उपवास धरून हे व्रत करतात. दर शुक्रवार उपवास करणाऱ्यांनी एक वेळचे जेवण घेऊन सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी विधीवत पूजा मांडून या पुस्तकातील मंत्रोच्चार आणि मातेची महती सांगणारी एखादी गोष्ट वाचावयाची असते. ही पूजा मांडून आरती केल्यानंतरच जेवण करून उपवास सोडायचा असतो. असे निश्चित केलेले 11 किंवा 21 शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन केले जाते.
यामध्ये नेहमीप्रमाणे पूजा मांडून मंत्रोच्चार, कथा सांगितली जाते. तस 7 किंवा 11 महिला किंवा कुमारीकांना गोडाचे नैवेद्य, फळं आणि वैभवलकक्ष्मी मातेची पुस्तिका देऊन या व्रताचे उद्यापन होते. उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा. आपण उपाशीच राहिले पाहिजे अथवा फराळाचेच खायला हवे, असा अट्टाहास नसावा. या व्रतातील उपवास कसे करावे याचीही माहिती पुस्तकात दिली आहे. साधारण 11 शुक्रवारचे व्रत हे तीन महिन्यात पूर्ण होते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)