Mahabharat Story: पाकिस्तानात असलेल्या ‘या’ जलाशयाजवळ युधिष्ठिराला विचारले गेले होते यक्ष प्रश्न

| Updated on: Aug 27, 2022 | 9:39 AM

असे म्हणतात की,  पांडव वनवासाच्या काळात या डोंगरावर आले होते आणि हाच तलाव आहे जिथे पांडव तहानलेले असताना पाण्याच्या शोधात पोहोचले होते. तलावावर यक्षाचा अधिकार होता.

Mahabharat Story: पाकिस्तानात असलेल्या या जलाशयाजवळ युधिष्ठिराला विचारले गेले होते यक्ष प्रश्न
याच ठिकाणी यक्षाने युधिष्ठिराला विचारले होते प्रश्न जे यक्षप्रश्न नावाने प्रसिद्ध आहेत
Image Credit source: Social Media
Follow us on

Mahabharat Story: कटास राज (Katas Raj Temple) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या उत्तरेकडील चकवाल जिल्ह्यातील पोतोहर पठारातील नमक कोह पर्वत रांगेत असलेले हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे एक प्राचीन शिवमंदिर (Shiv Temple) आहे. येथे इतरही मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरे दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. माता पार्वती सती गेल्यानंतर भगवान शंकराच्या डोळ्यांतून गाळलेल्या अश्रूंमुळे सरोवर तयार झाल्याची आख्यायिका आहे, नुकतेच पाकिस्तानी कोर्टाने या तलावात आटणाऱ्या पाण्याबद्दल चिंता व्यक्त केल्याने हे ठिकाण चर्चेत आले होते. मंदिर परिसरात असलेले हेच ते जलाशय आहे जेथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न (Yaksha’s quiz)  विचारले होते. हे मंदिर सहाव्या शतकात बांधले गेल्याचे सांगितल्या जाते. महाभारत काळातही हे मंदिर अस्तित्वात असल्याचे पुराणात दाखले आढळतात. या मंदिराशी संबंधित पांडवांच्या अनेक कथा आहेत. पांडवांनी वनवासात काही काळ इथे घालवला होता असेही मानले जाते.

या ठिकाणाला आहे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व

आख्यायिकेनुसार हे देवस्थान हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की, ते श्रीकृष्णाने बांधले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापना त्यांनी केली होती. मौर्य सम्राट अशोकानेही या ठिकाणी स्तूप बांधला होता, त्याचप्रमाणे चौथ्या शतकात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी फाहिन यानेही आपल्या प्रवासवर्णनांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. हे ठिकाण शीख गुरू नानक देव  यांनाही अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्याच्या आजूबाजूला उत्खनन करताना, 6000 ते 7000 ईसापूर्व काळातील संस्कृतींचे अवशेष सापडले आहेत.

येथे यक्षाने विचारले होते युधिष्ठिराला प्रश्न

असे म्हणतात की,  पांडव वनवासाच्या काळात या डोंगरावर आले होते आणि हाच तलाव आहे जिथे पांडव तहानलेले असताना पाण्याच्या शोधात पोहोचले होते. तलावावर यक्षाचा अधिकार होता. जेव्हा नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन असे चार भाऊ पाण्याच्या शोधात या तलावावर आले. तेव्हा यक्षाने त्यांना बोलावून सांगितले की, या पाण्यावर त्याचा अधिकार आहे, जर त्याला पाणी घ्यायचे असेल तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.  पांडवांपैकी चार भावांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही आणि जेव्हा त्यांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा यक्षाने त्यांना मूर्च्छित केले. शेवटी चार भावांचा शोध घेत युधिष्ठिर तेथे पोहोचला आणि चारही भावांना मूर्च्छित पडलेले पाहून विचारले की हे कोणी केले, तेव्हा यक्षाने सर्व प्रकार सांगितला, तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की तो प्रश्नांचे उत्तर द्यायला तयार आहेत. तेव्हा यक्षाने त्याला प्रश्न विचारले. यक्षाच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिल्याने मूर्च्छित पडलेल्या चार भावांना जीवनदान दिले.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)