Abhishek Sharma: जे बोलला ते करुन दाखवलं, अभिषेकचा विषयच हार्ड, मॅचपूर्वीचा Video Viral
Abhishek Sharma Video: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मालिका रंगली जी भारताने जिंकली. या सामन्यात मैदानात अभिषेकचे वादळ पाहायला मिळाले. आता अभिषेकने यापूर्वीच याची घोषणा केली होती. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने धुमाकूळ घातला. सामन्यापूर्वी पंजाबीमध्ये दिलेले प्रोत्साहनपर भाषण खरे ठरवत, या २६ वर्षीय शर्माने अवघ्या ३० चेंडूंमध्ये धमाकेदार शतक झळकावले. यासोबतच, इतिहासातील सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
अभिषेक शर्मा काय म्हणाला?
सामन्यापूर्वी संघाच्या बैठकीदरम्यान, अभिषेकने संपूर्ण संघाला एक जोशपूर्ण संदेश दिला. तो आपल्या सहकाऱ्यांना पंजाबीमध्ये म्हणाला, “योद्धे कधीही दया दाखवत नाहीत. आज आपण त्यांना अजिबात सोडणार नाही. हा मालिकेतील शेवटचा सामना आहे. स्टेडियममधील प्रेक्षकांकडे बघा, आज आपल्याला चाहत्यांचे पूर्ण मनोरंजन करायचे आहे.” या भाषणानंतर, त्याने अफगाण गोलंदाजीची अक्षरशः धुलाई करत आपले प्रत्येक शब्द खरे करून दाखवले.
अभिषेकने आपल्या शतकाने केवळ खळबळच माजवली नाही, तर पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. अभिषेकने एकहाती पहिल्या सहा षटकांत ७६ धावा ठोकत पोर्तुगालच्या कुलदीप घोलिया (७४*) आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड (७३*) यांचे पॉवरप्लेमधील विक्रम मोडले.
आपल्या संपूर्ण खेळीत, अभिषेकने नऊ चौकार आणि ११ षटकारांसह ३१७.६५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने एकूण ३४ चेंडूंचा सामना करत १०८ धावा केल्या. या कामगिरीने त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडला, जो त्याने २०१७ मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूंमध्ये केला होता. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील तिसरा सर्वात जलद शतकवीरही ठरला.
अभिषेक शर्माने शतकी खेळीनंतर एक सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचीच जास्त चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. शतकी खेळीनंतर सेलिब्रेशन जे केले ते खूप गाजले. अभिषेकने शतकी खेळीनंतर मैदानावरुन बसून ध्यान केले आणि आपले शतक सेलिब्रेट केले. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध सहज मालिका जिंकली. आता यानंतर त्याला सलामीवीर आणि मालिकावीर असे दोन पुरस्कार देण्यात आले.