विराट दुसऱ्यांदा पिता बनण्याच्या वक्तव्यावरून एबी डिविलियर्सचा यू-टर्न; म्हणाला “माझ्याकडून मोठी चूक”

| Updated on: Feb 09, 2024 | 1:06 PM

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत एबी डिविलियर्सने मोठं वक्तव्य केलं होतं. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे, असं त्याने म्हटलं होतं. मात्र आता त्याने या वक्तव्यावरून माघार घेतली आहे.

विराट दुसऱ्यांदा पिता बनण्याच्या वक्तव्यावरून एबी डिविलियर्सचा यू-टर्न; म्हणाला माझ्याकडून मोठी चूक
एबी डिविलियर्सचा यु-टर्न
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 9 फेब्रुवारी 2024 | टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली इंग्लंडविरोधातील पाच मॅचच्या सीरिजमधील शेवटचे तीन टेस्ट मॅच खेळणार की नाही याबाबत संभ्रम अद्याप कायम आहे. सीरिजच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमधून विराटने ब्रेक घेतला होता. यादरम्यान काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा मित्र एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनलवर मोठा खुलासा केला होता. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे आणि तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे, असं म्हणत त्याने विराट आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता अचानक एबी डिविलियर्सने त्याच्या या वक्तव्यापासून माघार घेतली आहे. इतकंच नव्हे तर त्याने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली आहे. एबी डिविलियर्सने म्हटलंय की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याने विराटबद्दल जी माहिती दिली, ती चुकीची होती.

एबी डिविलियर्सने ‘दैनिक भास्कर’शी बोलताना सांगितलं, “क्रिकेट नंतर येतं, सर्वांत आधी कुटुंब येतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी जी माहिती दिली होती, ती चुकीची होती. विराट कोहलीला ब्रेक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुटुंबालाच आधी प्राधान्य दिलं पाहिजे, क्रिकेट त्यानंतर येतं. विराट हा त्याच्या कौटुंबिक इमर्जन्सीमुळे बाहेर आहे. तो सध्या कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. विराटच्या जगभरातील चाहत्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी. विराट कोहलीच्या ब्रेक घेण्यामागील जो काही कारण असेल, मी आशा करतो की तो आणकी मजबूत होऊन मैदानावर परत येईल.”

हे सुद्धा वाचा

भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान होणाऱ्या पाच मॅचेसच्या सीरिजपैकी तिसरी टेस्ट मॅच राजकोटमध्ये येत्या 15 फेब्रुवारी खेळली जाणार आहे. पहिल्या दोन टेस्ट मॅचनंतर सीरिज 1-1 बरोबरीने आहे. शेवटच्या तीन टेस्ट मॅचेससाठी अद्याप भारताच्या स्क्वॉडची घोषणा झालेली नाही. दरम्यान बीसीसीआयच्या सीनिअर मेन्स सिलेक्शन कमिटीकडून विराटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, असं कळतंय.

एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब लाइव्हदरम्यान म्हटलं होतं, “मला इतकंच माहीत आहे की विराट ठीक आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. त्यामुळे पहिल्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये तो खेळला नाही. तो लवकरच दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. त्यामुळे कुटुंबीयांसोबत घालवलेली वेळ खूप महत्त्वाची असते.”