
बीसीसीआय निवड समितीने अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, सदस्य, बीसीसीआय पदाधिकारी आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून 15 सदस्यीय संघ जाहीर केला. तसेच 5 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे. या स्पर्धेतून काही प्रमुख खेळाडूंचं संघात कमबॅक झालं आहे.
सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह या दोघांचं टी 20i संघात कमबॅक झालं आहे. शुबमनचं कमबॅक झाल्याने भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल याचा गेम करण्यात आला आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे अक्षरला मोठा झटका लागला आहे. निवड समितीने अक्षर पटेल याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद काढून घेतलं आहे. तर शुबमनला उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
जसप्रीत बुमराह याचं आयसीसी वर्ल्ड कप 2024 नंतर टी 20i संघात कमबॅक झालं आहे. तर शुबमनने जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी 20i सामना खेळला होता. त्यानंतर आता दोघे पुन्हा एकदा परतले आहेत. मात्र शुबमनच्या एन्ट्रीमुळे अक्षरचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे.
अक्षर पटेलची जानेवारी 2025 मध्ये मायदेशात इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 टी 20i सामन्यांसाठी उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे हार्दिक पंड्या उपकर्णधार असताना अक्षरला संधी देण्यात आली होती. मात्र अवघ्या काही महिन्यांमध्येच अक्षरकडून हे पद काढून घेतल्याने चाहत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
अक्षर पटेल वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून भारतासाठी वनडे आणि प्रामुख्याने टी 20i फॉर्मेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. अक्षर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर कडक कामगिरी करत आहे. अक्षरने 71 टी 20i सामन्यांमधील 44 डावात 1 अर्धशतकासह 535 धावा केल्या आहेत. तसेच अक्षरने 71 विकेट्सही घेतल्या आहेत.
दरम्यान एकाच वेळेस सर्वांनाच मुख्य संघात संधी देता येत नाही. त्यामुळे दरवेळेस अनेक खेळाडूंची नाराजी होते. मात्र बीसीसीआय निवड समितीने आशिया कप 2025 साठी 5 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे. या 5 जणांमध्ये यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे.