
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात ओमानवर 21 धावांनी मात केली आहे. संजू सॅमसन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ओमानला अबुधाबातील शेख झायेद स्टेडियममध्ये विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. ओमानने या धावांचा पाठलाग करताना जोरदार झुंज दिली. ओमानच्या टॉप 3 फलंदाजांनी सर्वाधिक धावा करत टीमला जिंकवण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र ओमानला विजयी होता आलं नाही. ओमानचे प्रयत्न अपुरे पडले. ओमानला भारतासमोर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या. भारताने यासह साखळी फेरीत एकूण आणि सलग तिसरा विजय मिळवला. भारत यासह साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकणारा श्रीलंकेनंतर दुसरा संघ ठरला.
ओमानसाठी कॅप्टन जतिंदर सिंह आणि आमिर कलीम या दोघांनी 56 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर जतिंदर आऊट झाला. कुलदीपने ही सेट जोडी फोडली. जतिंदरने 33 बॉलमध्ये 5 फोरसह 32 रन्स केल्या. त्यानंतर आमिर आणि हम्माद मिर्झा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 93 रन्स जोडल्या. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा हर्षित राणा याने हार्दिक पंड्या याच्या हाती आमीरला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हार्दिकने सीमारेषेवर अप्रतिम कॅच घेतला. आमीरने ओमानसाठी सर्वाधिक धावा केल्या. आमीरने 46 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह 64 रन्स केल्या. त्यामुळे ओमानचा 17.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 149 असा स्कोअर झाला.
त्यानंतर टीम इंडियाने 6 धावांच्या मोबदल्यात ओमानला 2 झटके दिले. हार्दिक पंड्या याने हम्माद मिर्झा याला रिंकु सिंह (सबस्टीट्युड) याच्या हाती कॅच आऊट केलं. मिर्झाने 33 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह 51 रन्स केल्या. तर अर्शदीप सिंह याने विनायक शुक्ला याला 1 रनवर रिंकूच्या हाती कॅच आऊट करत टी 20i कारकीर्दीतील 100 वी विकेट मिळवली. तर जितेन रामानंदी याने नाबाद 12 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे सामना जिंकला मात्र शेवटच्या बॉलपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. ओमानने भारताला सहजासहजी सामना जिंकू दिला नाही.
संजू सॅमसन मॅन ऑफ द मॅच
For his brisk half-century to power #TeamIndia to 188/8, Sanju Samson bagged the Player of the Match award as India won the match by 21 runs. 👍👍
Scorecard ▶️ https://t.co/XAsd5MHdx4#INDvOMA | #AsiaCup2025 | @IamSanjuSamson pic.twitter.com/6qp6n10ILs
— BCCI (@BCCI) September 19, 2025
दरम्यान त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजाची निर्णय घेतला. भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 रन्स केल्या. भारतासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक केल्या. संजूने 45 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्ससह 56 रन्स केल्या. अभिषेक शर्मा याने 38 धावा जोडल्या. अक्षर पटेल याने 26, तिलक वर्मा 29 आणि हर्षित राणा याने 13* धावा केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. ओमानसाठी शाह फैसल, जितेन रामानंदी आणि आमिर कालमी या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.