AUS vs IND : शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाची पराभवाने सुरुवात, ऑस्ट्रेलिया 7 विकेट्सने विजयी

Australia vs India 1st ODI Match Result : टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 136 रन्स केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसच्या हिशोबाने 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सुरुवात केली.

AUS vs IND : शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाची पराभवाने सुरुवात, ऑस्ट्रेलिया 7 विकेट्सने विजयी
Australia vs India 1st ODI Match Result
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2025 | 5:58 PM

टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने तब्बल 5 वेळा खोडा घातला. त्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवण्यात आला. भारताने 9 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार विजयासाठी 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह या मालिकेत विजयी सलामी देत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तसेच ऑस्ट्रेलियाचा हा पर्थमधील पहिलावहिला एकदिवसीय विजय ठरला. भारताच्या डावात 5 वेळा खोडा घालणारा पाऊस दुसर्‍या डावात आलाच नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी समसमान परिस्थिती नव्हती. त्यामुळे पावसाने टीम इंडियावर अन्याय केल्याचं म्हटलं जात आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 10 धावांवर पहिला झटका दिला. अर्शदीप सिंह याने ट्रेव्हिस हेडला 8 धावांवर हर्षित राणा याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 33 रन्स जोडल्या. अक्षर पटेल याने मॅथ्यू शॉर्टला 8 रन्सवर आऊट केलं.

त्यानंतर मार्श आणि जोश फिलीप या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला. फिलीप 29 बॉलमध्ये 37 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर मार्श आणि मॅट रॅनशो या जोडीने चौथ्या विकेटसाठी नॉट आऊट 32 रन्सची  पार्टनरशीप करत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. मार्शने 46 रन्स केल्या. तर रेनशॉ याने 21 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

रोहित-विराट ढेर, केएल-अक्षरची निर्णायक खेळी

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाने बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशाजनक कामगिरी केली. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र दोघांनी निराशा केली. रोहितने 8 धावा केल्या. विराटला भोपळाही फोडता आला नाही. तर कॅप्टन म्हणून पहिला सामना खेळणारा शुबमन गिल याने 10 धावा केल्या. तर उपकर्णधार श्रेयस अय्यर याने 11 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र तिथून केएल राहुल आणि अक्षर पटेल या जोडीने निर्णायक योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी नितीश कुमार रेड्डी याने महत्त्वपूर्ण खेळी केली.

टीम इंडियाचा पराभव

अक्षर पटेल याने 31 धावा जोडल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 10 धावा केल्या. केएल राहुल याने 38 रन्स केल्या. तर नितीश रेड्डी याने 2 सिक्स ठोकत नाबाद 19 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 136 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड मिचेल ओवेन आणि एम कुहेनमन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर इतर दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.