AUS vs IND : टीम इंडियाचे फलंदाज ढेर, अभिषेक-हर्षितने लाज राखली, ऑस्ट्रेलियासमोर 126 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

Australia vs India 2nd T20i 1st Innings : अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या जोडीने निर्णायक भागीदारी करत भारताची लाज राखली. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे भारताला 125 रन्सपर्यंत पोहचता आलं.

AUS vs IND : टीम इंडियाचे फलंदाज ढेर, अभिषेक-हर्षितने लाज राखली, ऑस्ट्रेलियासमोर 126 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Abhishek Sharma and Harshit Rana
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 31, 2025 | 4:31 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाने भारताला 18.4 ओव्हरमध्ये 125 रन्सवर गुंडाळलं. टीम इंडियात आठव्या स्थानापर्यंत बॅटिंग करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात टीम इंडियाकडून किमान 150-160 धावांची अपेक्षा होती. मात्र भारतीय फलंदाजांनी घोर निराश केली. भारताचे 3 फलंदाज आले तसेच परत गेले. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ओपनर अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे भारताला 120 पार मजल मारता आली. आता भारतीय गोलंदाज 125 धावांचा बचाव करत चमत्कार करणार की ऑस्ट्रेलिया पहिला विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

29 धावांत पहिल्या 5 विकेट्स

शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने ठिकठाक सुरुवात केली. या दोघांनी 20 रन्स जोडल्या. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दणका दिला. ऑस्ट्रेलियाने भारताला 29 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. शुबमन गिल 5, संजू सॅमसन 2 आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तिलक वर्मा याला भोपळाही फोडता आला नाही. तर अक्षर पटेल गरज नसतानाही रन घेण्यासाठी धावला आणि विकेट गमावून बसला. त्यामुळे भारताची 7.3 ओव्हरमध्ये 5 आऊट 49 अशी स्थिती झाली.

सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

अक्षर आऊट झाल्यानंतर शिवम दुबे येणं अपेक्षित होतं. मात्र हर्षित राणा याला वर खेळण्याची संधी मिळाली. हर्षितने या संधीचं सोनं केलं आणि अभिषेकला अप्रतिम साथ दिली. हर्षितने या दरम्यान फटकेबाजी केली. अभिषेक आणि हर्षित जोडीने सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 56 रन्सची पार्टनरशीप केली. हर्षित आऊट होताच ही जोडी फुटली. हर्षितने 33 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह 35 रन्स केल्या.

ऑलराउंडर शिवम दुबेकडून अखेरच्या क्षणी फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र शिवम ढेर झाला. शिवमने 4 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कुलदीप यादव आला तसाच परत गेला. कुलदीपनंतर अभिषेक शर्माही आऊट झाला. अभिषेकने 37 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. अभिषेकने या खेळीत 2 सिक्स आणि 8 फोर लगावले. तर बुमराह रन आऊट होताच टीम इंडिया ऑलआऊट झाली.

ऑस्ट्रेलियासमोर 126 रन्सचं टार्गेट

ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर झेव्हीयर बार्टलेट आणि नॅथन एलिस या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मार्कस स्टोयनिस याच्या खात्यात 1 विकेट मिळवली.