वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अचानक कर्णधार बदलला, आश्चर्यकारक निर्णयाने क्रीडाप्रेमी आवाक्
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून 14 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र असं असताना आतापासून तयारी सुरू आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतल मेहदी हसनला कर्णधारपदावरून दूर केलं आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियापासून सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात तयारी करत आहे. तर कोणते खेळाडू असतील, नसतील याची चाचपणी सुरू आहे. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने एक मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला 14 महिन्यांचा अवधी शिल्लक असताना मेहदी हसन मिराजकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. तसेच या फॉर्मेटचं कर्णधारपद लिट्टन दास याच्याकडे सोपवलं आहे. असा तडकाफडकी निर्णय घेतल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसणं सहाजिकच आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ढाक्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची एक बैठक पार पडली आणि त्यात मेहदी हसन मिराजकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला.
मेहदी हसनला कर्णधारपदावरून का काढलं?
मेहदी हसनच्या नेतृत्वात बांग्लादेश क्रिकेट संघाची कामगिरी निराशाजनक होती. त्याच्या नेतृत्वात बांग्लादेश क्रिकेट संघाने 50 टक्के सामनेही जिंकलेले नाहीत. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप खेळणं क्रिकेट बोर्डाला योग्य वाटलं नाही. मेहदी हसनच्या नेतृत्वात बांगलादेशने 24 सामने खेळले आणि त्यापैकी 13 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर 10 सामन्यात विजय मिळाला आणि एक सामना बरोबरीत सुटला होता. त्याच्या नेतृत्वात बांगलादेशने वेस्ट इंडिजला 2025 मध्ये पराभूत केलं होतं. तर पाकिस्तानला याच वर्षी मार्चमध्ये नमवलं होतं.
Congratulations, Litton Kumer Das! 🇧🇩 The new captain of the Bangladesh ODI team. 🏏 pic.twitter.com/nWTUWYumiO
— Bangladesh Cricket (@BCBtigers) July 29, 2026
लिट्टन दासला जबाबदारी देण्याचं कारण की..
लिट्टन दास बांगलादेशचा वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहे. यापूर्वीही प्रभारी कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पाच वर्षे बांग्लादेश टी20 संघाचा कर्णधार राहिला आहे. तसेच बांगलादेशचं सात वनडे सामन्यात नेतृत्वही केलं आहे. त्यात तीन विजय, तीन पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दास यांची विजयी टक्केवारी 53टक्क्यांहून अधिक आहे. त्याचा अनुभव आणि विजयी टक्केवारी पाहता क्रिकेट बोर्डाने त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. 31 वर्षीय लिट्टन दासने बांगलादेशसाठी 104 वनडे सामने खेळले असून 2869 धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. तर 122 टी20 आणि 54 कसोटी सामने खेळले आहेत.