
टीम इंडियाने 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाचा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता टीम इंडिया आपली पुढील आंतरराष्ट्रीय मालिका जून महिन्यात खेळणार आहे. या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपवाद वगळता सर्व खेळाडू हे आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात खेळणार आहेत. आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 13 मार्चपासून दुसऱ्या टप्प्याचा थरार रंगणार आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाचं मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार टीम इंडिया मायदेशात 6 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिज तर डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे.
त्यानंतर टीम इंडिया नववर्षात 2027 वर्षात जानेवारी महिन्यात झिंबाब्वे विरुद्ध मालिका खेळणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत होणार आहे. तसेच टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. श्रीलंका भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. तर वेस्ट इंडिज टी 20i आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, टीम इंडियाला 10 महिन्यात 20 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेच्या हिशोबाने या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे दुखापत न झाल्यास टीम इंडियाची रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी खेळताना दिसेल, यात काडीमात्र शंका नाही.
विराट आणि रोहित या दोघांनी टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हे दोघे फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतात. त्यामुळे चाहत्यांना विराट आणि रोहितच्या कमबॅकची कायम प्रतिक्षा असते. त्यामुळे चाहत्यांना मायदेशात रोहित आणि विराटचा धमाका पाहायला मिळणार आहे.