
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या हंगामासाठी 10 संघांनी कंबर कसली आहे. त्याआधी झालेल्या मोठ्या विक्रीतून बीसीसीआयला तगडा फायदा झाला आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआय क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या विक्रीनंतर तगडा पैसा येणार असल्याचं निश्चित आहे. मंगळवारी 24 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या 2 संघांची विक्री करण्यात आली. यासह दोन्ही संघांना नवे मालक मिळाले. आयपीएलमधील या 2 संघांचं मालक होण्यासाठी खरेदीदारांनी खोऱ्याने पैसा ओतला. या व्यवहारानंतर बीसीसीआयला किती कोटींचा फायदा झाला हे जाणून घेऊयात.
नियमानुसार, आयपीएलमधील एका संघाच्या विक्रीनंतर बीसीसीआयला एकूण व्यवहारापैकी 5 टक्के रक्कम द्यावी लागते. आरसीबीची 16 हजार 660 कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. त्यानुसार 5 टक्के म्हणजे 833 कोटी रुपये होतात. राजस्थान रॉयल्सची जवळपास 15 हजार कोटी रुपयांना विक्री झाली. त्यानुसार बीसीसीआयला 750 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहेत. एकूणच बीसीसीआयला 2 संघांच्या विक्रीमुळे 1 हजार 538 कोटी रुपये मिळणार आहेत.
आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या विक्रीमुळे 24 मार्च हा आयपीएल स्पर्धेतील ऐतिहासिक दिवस ठरला. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांची मिळून एकूण 31 हजार कोटी रुपयांत विक्री झाली.
आता चाहत्यांना आरसीबी आणि राजस्थानचे नवे मालक कोण? याची उत्सूकता आहे. तर आरसीबीचा कुणी एकटा दुकटा मालक नाही. आरसीबी टीम खरेदी करण्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुप, डेव्हिड ब्लिट्झर आणि अमेरिकेतील प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन या 3 ग्रुपने पैसे मोजले आहेत.
आरसीबी 18 व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली. या विजयाच्या काही महिन्यानंतर तत्कालिन मालक युनायटेड स्पिरिट्सने आरसीबी फ्रँचायजी विक्रीत काढली होती.
दरम्यान काल सोमानी ग्रुपने राजस्थान रॉयल्ससाठी 15 हजार कोटी रुपये मोजले. मात्र या कराराची अंमलबजावणी ही आयपीएल 2026 नंतर होणार आहे. त्यामुळे मनोज बदाले हेच आगामी हंगामापर्यंत राजस्थानचे मालक असणार आहेत.