महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढील 72 तास धोक्याचे, पाऊस तांडव करणार, या जिल्हांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पुढील तीन दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, दरम्यान आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज देखील समोर आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळधार पाऊस सुरू आहे. चिंतेची बाब म्हणजे आता पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुणे, मुंबईसह कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये तर पावसाने धुमाकुळ घातला आहे, पावसांची संततधार सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात पुढील 48 तासांमध्ये शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे पुण्याला देखील पाऊस झोडपून काढणार आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा देखील नवा हवामान अंदाज समोर आला आहे.
काय आहे नवा हवामान अंदाज?
राज्यात पुढील तीन दिवस सहा जुलै, सात जुलै आणि आठ जुलै रोजी राज्यात अतिमुसळधार पाऊस राहणार आहे, मात्र त्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिली असेल ते शेतकरी आठ जूननंतर पेरणी करू शकतात. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात या काळात रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईत अति पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी. कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, बीड, लातूर, धाराशिव जिल्हा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागातील शेतकरी देखील पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणी करू शकतात, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
शाळांना सुट्टी
दरम्यान 6 जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, अनेक भागांमध्ये शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
