Bcci : टीम इंडियासाठी बीसीसाआय ‘बॅकफुट’वर;खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्ड माघार घेणार!

Bcci Team India : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय लवकरच नियमात बदल करणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेतल्यास टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

Bcci : टीम इंडियासाठी बीसीसाआय बॅकफुटवर;खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्ड माघार घेणार!
Image Credit source: axar patel x account
| Updated on: Mar 18, 2025 | 9:05 PM

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत बोर्ड अशी बीसीसीआयची जगभर ख्याती आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंना पाकिस्तानला पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. बीसीसीआय अखेरपर्यंत या भूमिकेवर ठाम राहिली. बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे आयसीसीच्या मध्यस्थीने यजमान पाकिस्तानला झुकावं लागलं. इतरांना झुकवणाऱ्या बीसीसीआयला आता मात्र आपल्याच माणसांसाठी झुकावं लागणार आहे. बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बॅकफुटला जाणार असल्याचं समजत आहे. नक्की प्रकरण काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय लवकरच स्वत:ने केलेल्या नियमांत बदल करणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी परदेश दौऱ्यासाठी क्रिकेटपटूंच्या कुटुंबियाबाबत नियम केला होता. मात्र बीसीसीआय त्यात बदल करणार आहे. सूत्रांनुसार, खेळाडूंना परदेश दौऱ्यात कुटुंबियांना सोबत घेऊन जायचं असेल तर, बीसीसीआयची परवानगी घेऊ शकतात. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या नियमाविरुद्ध प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता बीसीसीआय या नियमात बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बीसीसीआयचा नियम काय?

बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पराभवानंतर एक्शन मोडवर आली. बीसीसीआयने तेव्हा खेळाडूंच्या सुविधेत कपात करणयाचा निर्णय घेतला. त्यानुसार बीसीसीआयने परदेश दौऱ्यात खेळाडूंसोबत जाणाऱ्या कुटुंबियांबाबत कठोर निर्णय घेतला. खेळाडू त्यांच्या कुटुंबाला परदेश दौऱ्यावर फक्त 2 आठवड्यांसाठी सोबत घेऊन जाऊ शकतात, असं बीसीसीआयने ठरवलं होतं. मात्र या निर्णयाविरोधात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली यानेही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता बीसीसीआय या नियमात बदल करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

दरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. सध्या भारतात 2 महिने आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंडविरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपासूनच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या चौथ्या साखळीची सुरुवात होणार आहे.

उभयसंघातील या कसोटी मालिकेचं आयोजन हे 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. अशात आता बीसीसीआय या दौऱ्याआधी खेळाडूंच्या कुटुंबियांबाबतच्या नियमात कधीपर्यंत बदल करणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.