कर्णधार सूर्यकुमार यादव याचं घरी जंगी स्वागत, राहुल शेवाले यांनी दिल्या शुभेच्छा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी मात दिली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने हे यश मिळवलं. या विजयामुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव घरी परतल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं.

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने जेतेपद मिळवलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने हे यश मिळलं. भारताने तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा आणि यजमान म्हणून जेतेपद मिळवल्याचा मान मिळवला आहे. जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. देवनार येथील त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीत माजी खासदार राहुल शेवाळे देखील राहतात. मंगळवारी दुपारी निवासस्थानी परतलेल्या सूर्यकुमार यादव यांचे शेवाळे कुटुंबीय आणि इतर सोसायटी सदस्यांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दैदिप्यमान कामगिरीबाबत पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन शेवाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले. या स्वागतासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
“भारतीय संघाने क्रिकेटच्या टी 20 विश्वचषकावर आपले नाव कोरले, तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. या जगज्जेत्या संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या घरी परतले. त्यावेळी आमच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करणे, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. टीम इंडियाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!”, असं राहुल शेवाले म्हणाले. रोहित शर्माने टी20 क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व आलं होतं. त्याने ही जबाबदारी दोन वर्षे योग्य रित्या सांभाळली. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही यश मिळालं.
टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फक्त एकच सामना गमावला होता. या व्यक्तिरिक्त सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने साखळी फेरीत अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड यांना पराभूत केलं. पण सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं होतं. पण झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडसमोवर 255 धावांचं लक्ष्य ठेवलं. पण हे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडने नांगी टाकली. भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला.
