“एकदा क्रिकेट सोडल्यानंतर…” विराट कोहलीने निवृत्तीवर केलं थेट भाष्य
विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेदरम्यान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. विराट कोहली आता 35 वर्षांचा आहे.
![एकदा क्रिकेट सोडल्यानंतर... विराट कोहलीने निवृत्तीवर केलं थेट भाष्य एकदा क्रिकेट सोडल्यानंतर... विराट कोहलीने निवृत्तीवर केलं थेट भाष्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Virat_Kohli-23.jpg?w=1280)
भारतीय क्रिकेट इतिहासात विराट कोहली हे खूप मोठं नाव आहे. विराट कोहली म्हंटलं की खोऱ्याने धावा करणारा फलंदाज म्हणून छबी समोर येते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची खेळी प्रत्येकाला माहिती आहे. विराट कोहली 2008 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला झेंडा रोवून आहे. एक दशकाहून अधिक काळ विराट कोहलीने क्रीडारसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण कोणत्याही क्रिकेटरला एक ना एक दिवस या क्रिकेटला रामराम ठोकावा लागतो. क्रिकेटरच्या कारकिर्दीला वयाची खूप मोठी मर्यादा असते. कारण ठरावीक वयोमानानंतर तितकी खेळी करणं शक्य होत नाही. असं असताना विराट कोहलीने आपल्या निवृत्तीबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. तसेच मनातलं सर्वकाही उघड केलं आहे.
आरसीबीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये 35 वर्षीय विराट कोहली म्हणाला की, “पश्चाताप न करता जगण्याची इच्छा हीच प्रेरणा आहे. मला कोणतेही काम अपूर्ण ठेवायचे नाही जेणेकरून नंतर पश्चाताप होऊ नये. काम झाल्यावर मी निघून जाईन आणि काही काळ पुन्हा दिसणार नाही.” 35 वर्षीय कोहलीचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोहलीने टीम इंडियाच्या टी20 संघातून निवृत्ती जाहीर केली तरी आश्चर्य वाटायला नको.
10th Year Special: Virat Kohli 🤝 Mr. Nags 🥳🤣
Will there be Peace✌️or will there be War? 👊 Find out tomorrow. 🤩
This is @bigbasket_com presents RCB Insider.https://t.co/gShJyoMwR7#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 16, 2024
“जोपर्यंत मी खेळत आहे तिथपर्यंत मला माझं सर्वस्व खेळाला द्यायचं आहे. ही माझी प्रेरणा आहे.”, असं विराट कोहली पुढे म्हणाला. “प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये एक शेवटची वेळ येते. मी सुद्धा कायम खेळत राहाणार नाही. पण त्या दिवशी ते केलं असतं तर बरं झालं असतं, या भावनेत राहायचं नाही.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघात विराट कोहली आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. गेल्या 11 वर्षापासून टीम इंडियाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.दुसरीकडे, विराट कोहलीने आयपीएलमध्ये एकूण 8 शतकं झळकावली आहेत. तसेच सध्याच्या स्पर्धेत 13 सामन्यात खेळत 661 धावा केल्या आहेत. त्याच्या डोक्यावर गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅप आहे.