IND vs ENG : पावसामुळे तिसऱ्या दिवसाचं पॅकअप, टीम इंडियाकडे 96 धावांची आघाडी, सोमवार ठरणार निर्णायक

England vs India 1st Test Day 3 Stumps Highlights In Marathi : जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर भारताने 6 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 2 विकेट्स गमावून 90 धावा केल्या आहेत.

IND vs ENG : पावसामुळे तिसऱ्या दिवसाचं पॅकअप, टीम इंडियाकडे 96 धावांची आघाडी, सोमवार ठरणार निर्णायक
KL Rahul Team India
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 22, 2025 | 11:29 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वेळेआधी संपवण्यात आला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 2 विकेट्स गमावून 90 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे एकूण 96 धावांची आघाडी मिळवली आहे. कर्णधार शुबमन गिल आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल ही जोडी मैदानात नाबाद आहे. केएल 47 तर शुबमन 6 धावा करुन मैदानात आहेत. तर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या जोडीच्या रुपात भारताने 2 विकेट्स गमावल्या. त्यामुळे आता सामन्याच्या दृष्टीने चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे. टीम इंडिया चौथ्या दिवशी कशी कामगिरी करते? यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.

टीम इंडियासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतकी खेळी केली. यशस्वीने 101, शुबमनने 147 तर पंतने 134 धावांची खेळी केली. तर केएल राहुल याने 42 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाने अशाप्रकारे पहिल्या डावात ऑलआऊट 471 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरात 450 पार मजल मारण्यात यश मिळवलं. मात्र इंग्लंडला आघाडी मोडीत काढण्यात यश आलं नाही.

टीम इंडयाने इंग्लंडला पहिल्या डावात 465 रन्सवर ऑलआऊट करत 6 धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडसाठी ओली पोप आणि हॅरी ब्रूक या जोडीने सर्वाधिक धावा केल्या. पोपने 106 रन्स केल्या. तर ब्रूकचं शतक 1 धावेने हुकलं. बेन डकेट याने 62 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर प्रसिध कृष्णा याने 3 विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली. मात्र टीम इंडियाच्या 4 खेळाडूंनी 6 कॅचेस सोडल्या. त्यामुळे टीम इंडिया मोठी आघाडी मिळवण्यात अपयशी ठरली.

त्यानंतर टीम इंडियाने 6 रन्सच्या लीडसह दुसऱ्या इनिंगमध्ये तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 90 रन्स केल्या. भारताने यासह 96 धावांची आघाडी मिळवली.

भारताचा दुसरा डाव

केएल आणि यशस्वी या सलामी जोडीला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात अप्रतिम सुरुवात करता आली नाही. इंग्लंडच्या ब्रायडन कार्स याने 16 धावांवर भारताला पहिला झटका दिला. कार्सने यशस्वीला जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 11 चेंडूत 4 धावा केल्या. त्यानंतर केएल आणि डेब्यूटंट साई सुदर्शन या दोघांनी टीम इंडियाचा डाव चालवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 66 धावा जोडल्या. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने ही सेट जोडी फोडली. स्टोक्सने साईला झॅक क्रॉलीच्या हाती कॅच आऊट केलं.

तिसऱ्या दिवसाचा पावसामुळे गेम ओव्हर

साईने 48 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. तर 23.5 ओव्हरनंतर रिमझिम पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. खेळ संपला तोवर केएल राहुल याने 75 बॉलमध्ये 4 फोरसह 47 रन्सवर नॉट आऊट होता. तर शुबमन गिल 10 चेंडूत 1 चौकारासह 6 धावांवर नाबाद राहिला. आता या जोडीवर टीम इंडियाला चौथ्या दिवशी झकास पार्टनरशीप करुन देण्याची जबाबदारी असणार आहे.