ENG vs IND : टीम इंडियाला विजयासाठी 7 विकेट्सची गरज, इंग्लंडचा हिशोब करण्याची संधी, पाचव्या दिवशी कोण जिंकणार?

England vs India 2nd Test Day 4 Highlights In Marathi : कर्णधार शुबमन गिल याने दोन्ही डावात केलेल्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. भारताला विजयासाठी आता फक्त 7 विकेट्सची गरज आहे.

ENG vs IND : टीम इंडियाला विजयासाठी 7 विकेट्सची गरज, इंग्लंडचा हिशोब करण्याची संधी, पाचव्या दिवशी कोण जिंकणार?
Team India 2nd Test Against England
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 06, 2025 | 2:15 AM

भारतीय कसोटी संघाने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी कर्णधार शुबमन गिल याच्या ऐतिहासिक शतकाच्या मदतीने दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला. भारताकडे पहिल्या डावातील 180 धावांचा आघाडी होती. भारताने अशाप्रकारे इंग्लंडसमोर 608 रन्सचं टार्गेट दिलं. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 72 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 556 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या विजयासाठी आणखी 7 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे आता भारताने इंग्लंडला झटपट गुंडाळून मोठ्या फरकाने विजय मिळवून द्यावा, अशी आशा भारतीय चाहत्यांना असणार आहे.

आकाश दीप-सिराजची कडक बॉलिंग

भारतीय गोलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडला झटपट झटके देत शानदार सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने झॅक क्रॉली याला झिरोवर आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. सिराजने क्रॉलीला भोपाळाही फोडून दिला नाही.

त्यानंतर आकाश दीप याने इंग्लंडला दुसरा झटका देत पहिली वैयक्तिक विकेट मिळवली. आकाशने बेन डकेटला बोल्ड केलं. डकेटने 15 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. आकाश दीपने त्यानंतर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटला आऊट करत भारताला मोठी विकेट मिळवून दिली. आकाशने रुटला बोल्ड केलं. रुटने 16 चेंडूत 6 धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ संपला. इंग्लंडने 16 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 72 धावा केल्या. ओली पोप 24 आणि हॅरी ब्रूक 15 धावांवर नाबाद परतले. भारतासाठी आकाश दीप याने 2 तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा दुसरा डाव

टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या. त्यानंतर भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर गुंडाळून 180 रन्सची लीड मिळवली. भारताने दुसरा डाव हा 83 षटकांमध्ये 6 बाद 427 धावांवर घोषित केला. भारताने अशाप्रकारे इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक 161 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने नाबाद 69 धावा केल्या. ऋषभ पंत याने 65 रन्स जोडल्या. तर केएल राहुल याने 55 धावांची भर घातली. तर इतरांनी ठिकठाक योगदान दिलं. इंग्लंडसाठी जोश टंग आणि शोएब बशीर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ब्रायडन कार्स आणि जो रुट या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता पाचव्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.