
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यापूर्वी निकाल काय लागेल? याबाबत धाकधूक होती. पण भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. जेतेपदासह भारताने काही ऐतिहासिक नोंदी केल्या आहेत. सलग दोन जेतेपद मिळवणारा, तिसऱ्यांदा ट्रॉफी मिळवणारा, यजमानपद असताना जेतेपद मिळवणारा भारता हा पहिला संघ ठरला आहे. इतकंच काय तर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे. दोन आयसीसी जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे. असं असताना प्रशिक्षक गौतम गंभीर याने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित केलं आहे. जेतेपद मिळाल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला की, हे यश राहुल भाई आणि लक्ष्मण भाईला समर्पित करू इच्छितो.
गौतम गंभीरने जेतेपद राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जेतेपदानंतर गौतम गंभीरच्या या वक्तव्याने अनेकांची मनं जिंकली. पण असं सांगण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्याचं कारण असं की, गौतम गंभीरने त्यांच्या कामाला सलाम केला आहे. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाला चॅम्पियन होणं सोपं झालं. गौतम गंभीरच्या मते, राहुल द्रविडने वनडे वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियात आत्मविश्वास फुंकला. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंमध्ये दिसून आला. त्यामुळेच आज टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.
दुसरीकडे, सेंटर ऑफ एक्सीलेंस म्हणजेच सीओई ही भारतीय क्रिकेट कणा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या देखरेखीत खेळाडूंची फिटनेस आणि प्रशिक्षणाची काळजी घेतली जाते. त्यामुळे गौतम गंभीरने या दोघांना जेतेपद समर्पित केलं. गौतम गंभीरच्या मते या दोघांनी पडद्यामागून टीम इंडिया घडवण्याचा मोलाचं सहकार्य केलं आहे. यासाठीच गौतम गंभीर त्यांना श्रेय देण्यास विसरला नाही. टीम इंडियाने गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली आहे.