IND vs PAK : इथेही पाकिस्तानला लोळवलं, टीम इंडियाची विजयी सुरुवात

Hong Kong Sixes 2025 India vs Pakistan Match Result : दिनेश कार्तिक याच्या नेतृत्वात भारतीय संघाने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर मात केली.

IND vs PAK : इथेही पाकिस्तानला लोळवलं, टीम इंडियाची विजयी सुरुवात
IND vs PAK Hong Kong Sixes 2025
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Nov 07, 2025 | 3:55 PM

टीम इंडियाने क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध आपला दबदबा कायम ठेवला आहे. मेन्स टीम इंडियाने टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानला सलग 3 सामन्यांमध्ये हरवलं. त्यानंतर वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला लोळवलं. त्यानंतर आता टीम इंडियाच्या निवृत्त खेळाडूंनीही पाकिस्तानला त्यांची जाग दाखवून दिली आहे. भारतीय संघाने हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर मात करत विजयी सलामी दिली आहे. भारताने दिनेश कार्तिक याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे.

भारताची विजयी सलामी

भारताने पाकिस्तानसमोर 87 धावांचं आव्हान ठेवलं. पाकिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करताना 3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 41 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतर पावसाने खोडा घातला. त्यामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे अखेर सामन्याचा निकाल हा डीएलनुसार लावण्यात आला. भारताने हा सामना डीएलएसनुसार 2 धावांनी जिंकला.

सामन्यात काय झालं?

पाकिस्तानने या 6 षटकांच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 86 धावा केल्या. ओपनर रॉबिन उथप्पा आणि विकेटकीपर भरत चिपली या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. उथप्पाने 11 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरसह 28 रन्स केल्या. तर चिपलीने 13 चेंडूत 2 षटकार आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने 24 धावांची खेळी केली. तर अखेरीस कॅप्टन दिनेश कार्तिकने 17 रन्सचा फिनीशिंग टच दिला. पाकिस्तानसाठी मुहम्मद शहझादने 2 तर अब्दुल समदने 1 विकेट मिळवली.

ख्वाजा नफाय आणि माझ सदाकत या सलामी जोडीने पहिल्या 7 बॉलमध्ये 24 रन्स जोडल्या. तर अभिमन्यू मिथुन याने आठव्या अर्थात दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर माझला दिनेश कार्तिकच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानतंर ख्वाजा आणि अब्दुल समद या दोघांनी 3 ओव्हरपर्यंत 41 रन्स केल्या. समद 16 तर ख्वाजा 18 रन्सवर खेळत होते. तेव्हाच पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला.

पावसामुळे पुन्हा खेळ सुरु होण्याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही खेळ सुरु झाला नाही. त्यामुळे अखेर सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लावण्यात आला. भारताने अशाप्रकारे हा सामना डीएलएसनुसार 2 धावांनी जिंकला.

पाकिस्तानवर 2 धावांनी मात

टीम इंडियाचा पुढील सामना केव्हा?

दरम्यान टीम इंडिया या स्पर्धेतील आपला दुसरा क्रिकेट सामना हा 8 नोव्हेंबरला होणार आहे. भारतासमोर या सामन्यात कुवेतचं आव्हान असणार आहे. भारताकडे कुवेतला पराभूत करुन सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे.