INDA vs SLA : टीम इंडियाची कमाल, श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, 8 धावांनी मात

Sri Lanka A vs India A Match Result : भारतीय गोलंदाजांनी श्रीलंका ए विरुद्ध यशस्वीपणे 277 धावांचा बचाव केला. भारताने हा सामना 8 धावांनी जिंकत श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली.

INDA vs SLA : टीम इंडियाची कमाल, श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, 8 धावांनी मात
Vaibhav Sooryavanshi and India A Team
Image Credit source: Sri Lanka Cricket Via Bcci X Account
| Updated on: Jun 09, 2026 | 7:25 PM

तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने ट्राय सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने मालिकेतील सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंका ए वर 8 धावांनी मात केली. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंका जोरदार लढत देत धावांच्या जवळ येऊन पोहचली. त्यामुळे श्रीलंका जिंकेल असंच चित्र होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कमाल केली आणि सामना जिंकला. श्रीलंकेचा स्कोअर 47 ओव्हरमध्ये 6 आऊट 261 असा होता. त्यामुळे श्रीलंकेला 18 बॉलमध्ये 17 रन्सची गरज होती. त्यामुळे श्रीलंका सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र भारताने यशस्वीपणे धावांचा बचाव केला. भारताने श्रीलंकेला 7 धावांच्या मोबदल्यात 4 झटके देत ऑलआऊट केलं आणि तोंडातून विजयाचा घास हिसकावला. ऋतुराज गायकवाड भारताच्या विजयाचा हिरो ठरला.

सामन्यात काय घडलं?

भारताच्या बाजून नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार तिलक वर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 277 धावांपर्यंत मजल मारली. मिडल ऑर्डरमधील ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताला 270 पार पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. ऋतुराजने 114 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 101 रन्स केल्या. तर तिलकने 97 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 60 धावा केल्या. तसेच प्रियांश आर्या याने 32 रन्स केल्या. आयुष बडोनी याने 24 रन्स केल्या. तर सूर्यांश शेडगे याने अखेरच्या क्षणी नाबाद आणि निर्णायक 26 धावांचं योगदान दिलं. वैभव सूर्यवंशी याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र वैभव 14 धावा करुन बाद झाला. तर श्रीलंकेसाठी मोहम्मद शिराज याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

अखेरच्या क्षणी भारताचं कमबॅक आणि सामना जिंकला

श्रीलंकेने 278 धावांचा पाठलाग करताना 47 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 261 रन्स केल्या होत्या. तर कर्णधार सहान अरचिगे हा 74 धावांवर नाबाद खेळत होता. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 18 बॉलमध्ये फक्त 17 रन्सची गरज होती. श्रीलंकेचा विजयाच्या दिशेने प्रवास सुरु होता. मात्र अंशुल कंबोज याने 48 व्या ओव्हरमध्ये कमाल केली. अंशुलने सेट झालेल्या सहानला आऊट केलं. सहान आऊट झाल्याने सामना भारताच्या बाजूने झुकला. भारताने श्रीलंकेला 7 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले आणि 48. 5 ओव्हरमध्ये 269 रन्सवर ऑलआऊट करत सामना जिंकला.

श्रीलंकेसाठी सहानने सर्वाधिक धावा केल्या. सहानने 72 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. निरोशन डिकवेला याने 47 धावांचं योगदान दिलं. सदीरा समरविक्रमा याने 46 आणि अविष्का फर्नांडो याने 45 धावा जोडल्या. मात्र अखेरच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. अर्शद खान, अनुकूल रॉय, विपराज निगम आणि आयुष बडोनी या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अंशुल कंबोज याने 1 मात्र निर्णायक विकेट मिळवली.

Follow Us