विराट कोहलीची विकेट मैदानात नाही तर आधीच ठरली होती, असं झालं होतं प्लानिंग

आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला म्हणून बरं झालं. नाही तर टीम इंडियाचं काय खरं नव्हतं. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. इतकंच काय तर कसोटीत कमबॅक करणाऱ्या विराट कोहलीचा डाव अवघ्या 6 धावांवर आटोपला. पण त्याची विकेट घेण्यासाठी खास रणनिती आखली होती.

विराट कोहलीची विकेट मैदानात नाही तर आधीच ठरली होती, असं झालं होतं प्लानिंग
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 19, 2024 | 7:10 PM

विराट कोहलीने बऱ्याच कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. पण पहिल्याच कसोटीत त्याची बॅट काही चालली नाही. अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. बांगलादेशचा युवा गोलंदाज महमूद हसनने त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. पण विराट कोहलीची विकेट त्याला अशी मिळाली नाही. यासाठी खास रणनिती आखली गेली होती. बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू तमीम इकबालने याचं संपूर्ण श्रेय मैदानाबाहेरील एका व्यक्तीला दिलं. सामन्याचं पहिलं सत्र संपल्यानंतर तामीनने सांगितलं की, महमूदच्या गोलंदाजीमागे खूप सारं प्लानिंग झालं होतं. तमिमने इकबालने जिओ सिनेमाशी बोलताना सांगितलं की, ‘विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर कसोटीत पुनरागमन करत होता. यासाठी तो वेळ घेत होता. हे प्रत्येकासोबत होतं. सर्वांनी क्रिकेट खेळलं आहे. पण ज्या जागेवर कोहली शॉट खेळायला गेला तिथे तो अनेकदा आऊट झाला आहे. या विकेटचं श्रेय एनालिस्टला जातं. महमूदने चेंडू प्लानिंगनुसार टाकला आणि विराट कोहली त्यात फसला.’

विराट कोहली जेव्हा मैदानात उतरला तेव्हा टीम इंडियाची स्थिती 28 धावांवर 2 विकेट अशी होती. शुबमन गिलला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. विराट कोहली मैदानात उतरला तेव्हा संपूर्ण स्टेडियममधून विराट कोहलीचा जयघोष सुरु झाला. पण क्रीडारसिकांचा भ्रमनिरास झाला. महमूदने ठरल्याप्रमाणे चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला आणि कोहली तीच चूक करून बसला. विकेटकीपर लिटन दासने चूक न करता जबरदस्त झेल पकडला.

भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 गडी बाद 339 धावा केल्या आहेत. तसेच दुसऱ्या दिवशी यात आणखी 100 धावांची भर पडावी अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. दरम्यान, विराट कोहली दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करेल अशी आशा पार्थिव पटेलने व्यक्त केली आहे. ‘विराट कोहली दुसऱ्या डावात ऑफ स्टम्पबाहेरचे चेंडू सोडून देईल. जर पहिल्या डावात चेंडू बॅटचा मधोमध लागला असता तर विराट वेगळाच दिसला असता. महान क्रिकेटपटूंसोबत असं होतं. प्रत्येकासोबत असं झालं आहे.’