IND vs BAN : पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकात संपला, टीम इंडियासाठी पुढचं गणित धाकधूक वाढवणारं

भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरमध्ये सुरु आहे. हा सामना भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण पहिल्या दिवशीचा खेळ फक्त 35 षटकात संपल्याने टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.

IND vs BAN : पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकात संपला, टीम इंडियासाठी पुढचं गणित धाकधूक वाढवणारं
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 27, 2024 | 6:21 PM

भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सामना कानपूरमध्ये सुरु आहे. पण पहिल्याच दिवशी वरुणराजाची अवकृपा झाली आणि फक्त 35 षटकांचा खेळ झाली. बांगलादेशने 107 धावांसह 3 विकेट गमावले आहेत. पण भारतासाठी ही काही आनंदाची बातमी नाही. कारण पुढच्या मालिका पाहता बांगलादेशचा सोपा पेपर सोडवणं गरजेचं आहे. पण पहिल्याच दिवशी पावसाचं विघ्न पडल्याने पुढचं चित्र आणखी बिकट होऊ शकते. कारण पुढचे दोन दिवस सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला तर भारताचं नुकसान होईल. कारण पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आता फक्त 4 दिवसांचा खेळ शिल्लक आहे. चार दिवसात सामन्याचा निकाल लागू शकतो. पण पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्युवेदर फोरकास्टनुसार, कानपूरमध्ये शुक्रवार आणि शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. शनिवारी पाऊस सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत कोसळेल असं सांगण्यात येत आहे. इतकंच काय तर शनिवारी 80 टक्के पावसाचा अंदाज आहे. पण ही समस्या इथेच संपत नाही. रविवारी 29 सप्टेंबरलाही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळी सामना सुरु होताच पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. त्यामुळे पाच दिवसातील बराच वेळ पावसामुळे वाया जाईल. त्यामुळे सामना पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बांगलादेशला फायदा होईल. तर भारताला फटका बसेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी आहे. संघाची विजयी टक्केवारी ही 71.67 इतकी आहे. पण हा सामना ड्रॉ झाला दोन्ही संघांना 4-4 गुण मिळतील. त्यामुळे भारताची विजयी टक्केवारी 68.18 इतकी होईल. त्यामुळे अंतिम फेरीचं गणित बिघडू शकतं. सध्या भारतीय संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यात भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. हा सर्वात कठीण पेपर असणार आहे. भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. मात्र दोन्ही वेळेस पदरी अपयश पडलं.

Follow Us