IND vs ENG : जो रुटच्या नाबाद दीडशतकी खेळीसह इंग्लंडचा 391 धावांचा डोंगर, भारतावर 27 धावांची आघाडी
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावांचा डोंगर उभा केला आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 364 धावा जमवल्या तर त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने काल दुसऱ्या दिवसअखेर 45 षटकांमध्ये 3 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आजचा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी प्रामुख्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाजवला. इंग्लंडने आज दिवसअखेर सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडला या डावात 27 धावांची आघाडी मिळाली आहे.
इंग्लंडकडून या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक 180 धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने 57 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉनी बर्न्स याने काल 49 धावांची खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली होती. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा चांगलाच कस लागला. रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी फार वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. मात्र आज पुन्हा एकदा रुटने भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.
तत्पूर्वी लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याचा निर्णय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चुकीचा ठरवला. रोहितने आक्रमक फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली, तर राहुलने त्याला साथ दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला फारसे काही करता आले नाही आणि तो स्वस्तात बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर राहुलने कोहलीसह भारतीय डावाची धुरा सांभाळली आणि या दरम्यान राहुलने लॉर्ड्सवर आपले पहिले शतक झळकावले. विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 42 धावांचे योगदान दिले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने 40 धावांचे योगदान दिले. तर रिषभ पंतने 37 धावा जमवल्या. 129 धावांची खेळी करुन राहुल बाद झाला. राहुल-रोहित, कोहली आणि जाडेजाने दिलेल्या धावांच्या योगदानामुळे भारताला पहिल्या डावात 364 धावा उभारता आल्या.
इतर बातम्या
(IND vs ENG 2021, England team score in second test match day 3 at lords, Joe Root hits century again)