IND vs ENG : विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर बरंच काही सांगितलं, म्हणाला…

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. दुसरा कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने 1-1 ने बरोबरी साधली आहे. दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली. विजयानंतर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

IND vs ENG : विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर बरंच काही सांगितलं, म्हणाला...
IND vs ENG : दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या भावनांना करून दिली मोकळी वाट, काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या
| Updated on: Feb 05, 2024 | 3:19 PM

मुंबई : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना इंग्लंडने जिंकला. त्यामुळे दुसरा सामना जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर होतं. त्यात इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीमुळे निकाल काय लागेल सांगता येत नाही. अशा दबावात टीम इंडियाने दुसरा सामना 106 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही मोठी उसळी घेतली आहे. पाचव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमराह. कारण त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या गोलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकून दिली. बेझबॉल रणनितीच्या अक्षरश: चिंध्या केल्या. पहिल्या डावात 15.5 षटकं टाकली. त्यात 5 निर्धाव षटक आणि 45 धावा देत 6 गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची पुन्हा एकदा जादू दिसली. 17.2 षटकापैकी 4 षटकं निर्धाव टाकली. तर 46 धावा देत 3 गडी बाद केले. त्यामुळे या विजयात मोलाची साथ लाभली ती जसप्रीत बुमराहची. त्याने या खेळीनंतर अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिली.

इंग्लंडचा निम्मा संघ बाद केला आणि मोलाची भूमिका बजावली, यावर काय वाटतं? असा प्रश्न बुमराहला विचारला गेला. त्यावर त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “मी आधीही यावर बोललो आहे. मी या आकडेवारीकडे पाहात नाही. मी तरुण असताना याबाबत उत्साही असायचो. पण क्रिकेटमध्ये पुढे जाताना बरंच काही शिकलो आहे.” पोपला बाद केल्यानंतर तुझ्या यॉर्करची चर्चा होत आहे, या प्रश्नावरही जसप्रीतने मन मोकळं केलं. “मी पहिली डिलिव्हरी शिकलो ती यॉर्कर. वकार, वसीम आणि अगदी झहीर यांना पाहात मी मोठा झालो आहे.”

टीमच्या एकूण कामगिरीबाबतही जसप्रीत बुमराहला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला “आमचा संघ एक संक्रमणातून जात आहे. त्यामुळे संघाला माझ्याकडून मदत होणं ही एक जबाबदारी आहे. रोहित सोबत मी या गोष्टींवर चर्चा करतो.” जेम्स अँडरसन्ससोबत तुझी स्पर्धा आहे का? या प्रश्नावरही त्याने आपलं मत मांडलं. “खरं सांगायचं तर माझी त्याच्या स्पर्धा नाही. मी क्रिकेटपटूपूर्वी वेगवान गोलंदाजीचा चाहता आहे. जर कोणी चांगलं करत असेल तर त्याचं अभिनंदन करतो.”

तिसऱ्या कसोटीसाठी अजूनही टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणते खेळाडू संघात खेळतील आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल हे अद्याप स्पष्ट नाही. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा मानस असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us