IND vs NZ : ऋषभ पंत आऊट की नॉट आऊट? रोहित शर्माने सांगितलं की…

ऋषभ पंतची एकाकी झुंज एका निर्णयामुळे संपली आणि भारताचा पराभव निश्चित झाला. न्यूझीलंडने दिलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना ऋषभ पंत 57 चेंडूत 64 धावा करून बाद झाला.भारताचा डाव 121 धावांवर आटोपला आणि 25 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

IND vs NZ : ऋषभ पंत आऊट की नॉट आऊट? रोहित शर्माने सांगितलं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 03, 2024 | 3:59 PM

भारताने देशातील कसोटी क्रिकेटमधील दबदबा गमावला आहे. न्यूझीलंडने भारताला 3-0 ने मात दिली आणि आजवरचे सर्वच विक्रम मोडीत काढले. भारताच्या गेल्या 12 वर्षांच्या मालिका विजयात खंड पडला आहे. भारताने मालिका गमावल्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात तरी विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र या सामन्यात तर विचित्र घडलं. ऋषभ पंत वगळता एकही फलंदाज दुसऱ्या डावात चालला नाही. ऋषभ पंत जिथपर्यंत मैदानात होता तिथपर्यंत सामना जिंकण्याची आस होती. दोन वेळा आऊट होता होता वाचला होता. त्यामुळे ऋषभ पंत मॅच काढेल असं वाटत होतं. एकदा न्यूझीलंडने रिव्ह्यू घेतला आणि वाया गेला. तर एकदा रिव्ह्यूच घेतला नाही. त्यामुळे आजचा दिवस ऋषभ पंतच्या बाजूने आहे असं वाटत होतं. पण शेवटी वादग्रस्त पद्धतीने बाद होऊन परतण्याची वेळ आली. 22 व्या षटकात एजाज पटेलचा चेंडू फिरकी घेत मधे घुसला. पंतने फिरकीचा अँगल कमी करण्यासाठी पुढे पाय टाकला पण चेंडू बराच लांब होता. त्यामुळे चेंडू खेळताना फसला आणि टॉम ब्लंडेलच्या हाती गेला.

ऋषभ पंत हसला आणि बाजूला गेला. त्यामुळे रिव्ह्यू घ्यायचा की नाही असा प्रश्न पडला. कारण फिल्ड पंचांनी नाबाद दिला होता. पंत 64 धावांवर होता त्यामुळे रिव्ह्यूचा निर्णय घेतला. अल्ट्राएजमध्ये स्पाइक दिसले आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आंनदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पण हे स्पाइक बॅटचे नसून फ्रंट पॅडचे होते. पण टीव्ही पंच पॉल रायफल यांना वाटलं की चेंडू बॅटला लागला आहे. त्यामुळे त्याला बाद देण्यात आलं. पंतने या निर्णयाचा विरोध केला पण काहीच करता आलं नाही.

पत्रकार परिषदेत रोहित शर्माला या वादग्रस्त विकेटबाबत विचारण्यात आलं. तेव्हा रोहित शर्माने सांगितलं की, “यावर भाष्य करू शकतो की नाही ते माहिती नाही. पण त्याबाबत स्पष्टता नव्हती तर फिल्डवरील पंचांचा निर्णय का बदलला? असे निर्णय घेण्यासाठी स्पष्टता तपासणं गरजेचं असतं. या विकेटवर सामन्याचा निकाल अवलंबून होता.” ऋषभ पंतची विकेट गेल्यानंतर भारताची स्थिती नाजूक झाली. तेव्हा भारताच्या 106 धावा झाल्या होत्या आणि 41 धावा पाहीजे होत्या. ऋषभ पंतच्या विकेटनंतर उर्वरित तीन विकेट 16 धावांच्या आत पडल्या आणि भारताला 25 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

एबी डिव्हिलियर्सनेही या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘वाद.. पुन्हा एक अस्पष्ट प्रकरण. पंतची बॅट लागली की नाही. जेव्हा चेंडू बॅट जवळून जातो तेव्हा स्निकोमीटर आवाज पकडतो. पण त्याने बॉल मारला याची खात्री कशी असणार? मला याची नेहमीच काळजी वाटत असते आणि इथे एका मोठ्या कसोटी सामन्यात निर्णायक क्षणी असे घडते. हॉटस्पॉट कुठे आहे?”