IND vs NZ : दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघर्ष, दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल, भारताला 5 विकेट्सची आवश्यकता

| Updated on: Dec 05, 2021 | 5:51 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. मुंबई कसोटी भारताच्या नियंत्रणात दिसत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजीमुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे.

IND vs NZ : दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघर्ष, दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल, भारताला 5 विकेट्सची आवश्यकता
Follow us on

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. मुंबई कसोटी भारताच्या नियंत्रणात दिसत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजीमुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे. पहिल्या डावात भारताने 325 धावांपर्यत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणारा न्यूझीलंडचा संघ 62 धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे. (IND vs NZ : India need 5 wickets to win Mumbai Test, Mayank agarwal, Ravichandran Ashwin, Axar Patel)

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने किवी कर्णधार टॉम लॅथमला (6) स्वस्तात बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (20) आणि रॉस टेलर (6) यांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवत न्यूझलंडला संकटात टाकलं. त्यानंतर डॅरिल मिचेलने फटकेबाजी करत झुंज दिली, मात्र तोदेखील 60 धावा करुन अक्षर पटेलची शिकार ठरला. त्यानंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. 129 धावांत न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज हेन्री निकोल्स (36) आणि रचिन रवींद्र (2) या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी 8 षटकं खेळू काढली. त्यामुळे न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली.

भारताचा पहिला डाव

दरम्यान, कालच्या बिनबाद 69 धावांवरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी आजच्या दिवसाची चांगली सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी शतकी (107) भागीदारी रचली. मात्र मयंक अग्रवाल अर्धशतक पूर्ण होताच 62 धावांवर असताना एजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ पुजारादेखील 47 धावांवर असताना माघारी फिरला. त्यालादेखील एजाजनेच पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू रचिन रवींद्रला मोठा फटका लगावण्याच्या नादात गिल बाद झाला. त्यानेदेखील 47 धावांचं योगदान दिलं.

पुजारा आणि गिल दोघांनाही अवघ्या तीन धावांनी अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्यानंर रचिननेच विराटचा (36)अडथळा दूर केला. विराट बाद झाल्यावर प्रत्येक भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर (8 चेंडूत 14), ऋद्धीमान साहा (12 चेंडूत 13), जयंत यादव (6) आणि अक्षर पटेलने 26 चेंडूत 41 धावांची खेळी केली. अक्षरने 4 षटकार आणि 4 चौकार लगावले. भारतीय फलंदाजांनी या डावात एकूण 11 षटकार लगावले. अखेर 7 बाद 276 धावांवर भारतीय संघाने डाव घोषित केला.

इतर बातम्या

Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा

IND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Thane : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार

(IND vs NZ : India need 5 wickets to win Mumbai Test, Mayank agarwal, Ravichandran Ashwin, Axar Patel)