
आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील दुसर्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. पाकिस्तानने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये साहिबजादा फरहान याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या सलामी जोडीने अफलातून आणि विस्फोटक सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने 172 धावांचा पाठलाग करताना 105 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. शुबमन आणि अभिषेकने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. विकेट्स मिळत नसल्याने आणि धुलाई होत असल्याने पाकिस्तानचे गोलंदाज रडकुंडीला आले. त्यामुळे मैदानात वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं.
अभिषेक शर्मा याने भारताच्या डावातील पहिल्याच बॉलवर शाहिन अफ्रिदीला सिक्स ठोकला. टीम इंडियाने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने सॅम अयुबने टाकलेल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा मिळवल्या. मात्र शाहिन त्याच्या कोट्यातील दुसर्या ओव्हरमध्ये महागडा ठरला. गिल-अभिषेकने शाहिनला 12 धावा ठोकल्या. त्यामुळे शाहिन आणि अभिषेक भिडले. मात्र या सलामी जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजाकडे फार लक्ष दिलं नाही. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये अभिषेकने अब्रार अहमद याला 2 बॉलमध्ये फोर आणि सिक्स लगावलं. भारताने अशाप्रकारे 43 धावा केल्या.
हरीस रऊफ टीम इंडियाच्या डावातील पाचवी ओव्हर टाकायला आला. रऊफच्या ओव्हरमध्ये या सलामी जोडीने 12 धावा काढल्या. या दरम्यान अभिषेक आणि हरीस यांच्या वाद झाला. वाद टोकाला गेला. दोघांमध्ये शिवागाळ झाली. तर याच ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर शुबमनने रऊफने टाकलेल्या बॉलवर फोर लगावला. त्यामुळे हरीस रऊफ भडकला. रऊफने अभिषेकसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिषेकनेही त्याच ताकदीने हरीस रऊफला सुनावलं. दोघेही आमनेसामने आले. त्यामुळे पंचांना दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हरिस-अभिषेक भिडले
gill and abhishek shown aukat to this porki haris rauf#INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/0QByqZnNE0
— SouLKirmada (@BabluuuuOp) September 21, 2025
दरम्यान अभिषेक आणि शुबमन या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. अभिषेकने या दरम्यान चारही बाजूला फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने 24 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतर ही जोडी पाकिस्तानने फोडली. पाकिस्ताने भारताला 105 धावांवर पहिला झटका दिला. भारताने शुबमनच्या रुपात पहिली विकेट गमावली. यासह शानदार सलामी भागीदारीचा शेवट झाला. शुबमनने 47 धावा केल्या.