IND vs PAK : पाकिस्तान कोलंबोत टीम इंडिया विरूद्धचा शेवटचा सामना कधीच विसरणार नाही, काय झालं होतं?
T20i World Cup 2026 IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांची कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी 15 फेब्रुवारीला आमनेसामने येण्याची इतिहासातील दुसरी वेळ असणार आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 8 मार्चला महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ वर्ल्ड कप चॅम्पियन ठरणार आहे. मात्र त्यासाठी आता बराच वेळ आहे. सध्या साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे 20 संघात सुपर 8 फेरीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना फायनलआधी मकामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात दुसरं तिसरं कुणी नसून टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. सामन्याला आता काहीच तास बाकी आहेत त्यामुळेच चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा या मैदानात पाकिस्तान विरुद्ध दबदबा राहिला आहे. पाकिस्तान या मैदानातील टीम इंडिया विरुद्धचा शेवटचा टी 20i सामना कधीच विसरणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियम एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला आहे. भारताने त्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्या सामन्यात नक्की काय झालं होतं? तो सामना केव्हा खेळवण्यात आला होता? भारताला त्या सामन्यात विजयी करण्यात कुणी योगदान दिलं होतं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
भारत-पाक सामना
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ 30 सप्टेंबर 2012 रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने सुपर 8 फेरीत आमनेसामने आले होते. टीम इंडियाने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानवर सहज विजय मिळवला होता. भारताने धारदार बॉलिंगच्या जोरावर पाकिस्तानला 130 धावांच्या आत गुंडाळलं. भारताने पाकिस्तानला 19.4 ओव्हरमध्ये 128 धावांवर गुंडाळलं.
भारतासाठी त्या सामन्यात लक्ष्मीपती बालाजी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तसेच युवराज सिंह आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेण्यात यश मिळवलं. तर इरफान पठाण आणि विराट कोहली या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
विराट खेळी आणि भारताचा विजय
त्यानंतर टीम इंडियाने 129 धावांचं आव्हान 18 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 2 विकेट्स गमावून 17 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. गौतम गंभीर याला भोपळाही फोडता आला नाही. ओपनर वीरेंद्र सेहवाग याने 29 धावा केल्या. त्यानंतर युवराज सिंह आणि विराट कोहली या दोघांनी भारताला विजयी केलं. विराटने सर्वाधिक आणि नाबाद 78 धावांची खेळी केली. तर युवराजने 19 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे प्रेमदासा स्टेडियममध्ये विजय मिळवला. आता टीम इंडिया 2026 साली 2012 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार करणार पाकिस्तान परतफेड करण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानतंरच स्पष्ट होईल.