IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंकेत करो या मरोची कसोटी, दोन सामन्याच्या टेस्ट सीरिजचं वेळापत्रक जाहीर

भारतीय संघ टी20 आणि वनडे मालिकेत व्यस्त असताना कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंकेत करो या मरोची कसोटी, दोन सामन्याच्या टेस्ट सीरिजचं वेळापत्रक जाहीर
IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंकेत करो या मरोची कसोटी, दोन सामन्याच्या टेस्ट सीरिजचं वेळापत्रक जाहीर
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 02, 2026 | 5:16 PM

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त झाला आहे. नुकताच आयर्लंड दौरा पार पडला. या दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मालिका खेळेल. असं असताना आता भारतीय संघाचं कसोटी पर्वही सुरू होणार आहे. कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. ही कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम सामन्याच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे.

भारतीय संघ नऊ वर्षानंतर श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. मागच्या वेळी भारतीय संघ 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळला होता. पण या वेळची कसोटी मालिका थोडी वेगळी आहे. कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत भारताची कामगिरी काही विशेष नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने गमावल्याने भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. त्यामुळे ही मालिका काही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. जर तसं झालं नाही तर भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता अधिक आहे.

भारतीय संघ 13 दिवसात दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला सुरू होईल. हा कसोटी सामना गॉल स्टेडियममध्ये 19 ऑगस्टपर्यंत असेल. मागच्या दौऱ्यात भारतीय संघाने श्रीलंकेला याच मैदानात 304 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. मागच्या दौऱ्यात भारताने या मैदानात खेळलेला सामना एक डाव आणि 53 धावांनी जिंकला होता.

टी20 मालिका रद्द!

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार असं बोललं जात होतं. पण यावर आता पडदा पडला आहे. श्रीलंकेतील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून या मालिकेचं आयोजन करण्याचे प्रयत्न होते. दोन्ही बोर्ड यासाठी सकारात्मक होते. पण सध्या तरी या मालिकेबाबत काहीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही मालिका रद्द झाल्याचं बोललं जात आहे.

Follow Us