IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवला. खरं तर कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हा विजय खूपच महत्त्वाचा होता. कारण आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात फक्त आणि पराभव पाहायला मिळाला.

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात झिम्बाब्वे विजयासाठी 126 धावांचं छोटसं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे विजय होईल हे निश्चित होतं. पण मागच्या काही सामन्यातील अनुभव पाहता मनात शंकाही होती. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. पण भारतीय गोलंदाज फलंदाजांनी यावेळी आपलं कौशल्य दाखवलं आणि विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने नेतृत्व हाती घेतल्यापासून नाणेफेक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. पण विजय काही मिळत नव्हता. अखेर 7 सामन्यानंतर आठव्या सामन्यात टीम इंडियाला विजयाची चव चाखता आली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरने सुटकेचा श्वास सोडला असेल. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीमुळे निम्मा सामना हातात पावरप्लेमध्येच आला होता. वैभवच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताने पावरप्लेच्या 6 षटकात 66 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेलं 126 धावांचं आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताची फलंदाजी
झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने चांगली सुरूवात करून दिली. पण अभिषेक शर्माची साथ काही वैभवला लाभली नाही. अभिषेक शर्मा या सामन्यात फेल गेला. त्याने 8 चेंडूंचा सामना केला आणि अवघी एक धाव करून तंबूत परतला. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या वैभव सूर्यवंशीने ही उणीव भरून काढली. त्याने 19 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार मारून 263च्या स्ट्राईक रेटने 50 धावा करून बाद झाला. त्याच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय सोपा झाला होता. इशान किशनला देखील या सामन्यात सूर गवसल्याचं दिसून आलं. विजयाच्या तोंडावर असताना इशान किशन 35 धावा करून बाद झाला.
भारताची गोलंदाजी
भारताकडून मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी भेदक गोलंदाजी केली. त्याच्या अचूक टप्प्याच्या माऱ्यामुळे भारताने झिम्बाब्वेला 125 धावांवर रोखलं. मयंक यादवने 4 षटकात 18 धावा देत 2 गडी बाद केले. तर प्रिन्स यादवने 4 षटकात 19 धावा देत 2 विकेट काढल्या. शिवम दुबेने 4 षटकात 32 धावा दिल्या आणि एक विकेट काढण्यात यश मिळालं. तर फिरकीपटू रवि बिष्णोई याने 4 षटकात 6 च्या धावगतीने 24 धावा देत एक गडी बाद केला.