मुंबई: एजबॅस्टन कसोटीवर (Edgbaston Test) पहिले तीन दिवस टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. पण चौथ्यादिवशी भारताची पकड सैल झाली. ज्याचा पुरेपूर फायदा इंग्लिश संघाने उचलला. भारताने इंग्लंडसमोर (IND vs ENG) विजयासाठी 378 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. सुरुवातीला हे टार्गेट अवघड वाटत होते. पण इंग्लंडचे सलामीवीर लीस आणि क्रॉलीने दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर रुट-बेयरस्टो (Root-Bairstow) जोडीने त्या पायावर कळस चढवला. त्यामुळे सध्या इंग्लंडसाठी विजय सोपा दिसत आहे. भारतीय गोलंदाज काल संघर्ष करत होते. त्यांना आधी लीस-क्रॉली जोडीने त्यानंतर रुट-बेयरस्टो जोडीने दाद दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळालं नाही. भारतीय संघाच्या या स्थितीला एक खेळाडूही जबाबदार आहे. ज्याने महत्त्वाच्या प्रसंगी झेल सोडला. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं.
टीम इंडियाने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडकडून एलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीने चांगली सुरुवात केली. दोघांनी 107 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर असं वाटलं की, टीम इंडिया कदाचित कमबॅक करेल. पण भारतासाठी त्यांचाच एक खेळाडू विलन बनला. मागच्या मॅचमध्ये शतक झळकवणारा जॉनी बेयरस्टो चांगल्या फॉर्म मध्ये आहे.
जॉनी बेयरस्टो 14 धावांवर खेळत असताना, त्याला आऊट करण्याची चांगली संधी होती. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. चेंडू बेयरस्टोच्या बॅटची कड घेऊन स्लीप मध्ये गेला. पण हनुमा विहारीने हा झेल सोडला. ही चूक टीम इंडियाला खूप भारी पडली. रुटने बेयरस्टो सोबत शतकी भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने टीम इंडियाला विजयापासून दूर नेलं. हनुमा विहारी फलंदाजीतही विशेष चमक दाखवू शकला नाही. रोहित शर्मा कोविडमुळे या कसोटीत खेळू शकला नाही. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला सलामीला पाठवलं. त्याच्याजागी हनुमा विहारी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला. पहिल्या डावात त्याने फक्त 20 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 11 धावा केल्या.
आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे. ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोने जबरदस्त फलंदाजी केली. दोघेही खेळपट्टीवर टिकून आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेर इंग्लंडच्या तीन बाद 259 धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची आवश्यकता आहे.