
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील मुख्य सामन्याआधी धमाका केला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील 10 व्या आणि आपल्या पहिल्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 240 धावा केल्या आहेत. भारतासाठी या सामन्यात इशान किशन याने सर्वाधिक धावा केल्या. तर काही फलंदाज हे स्फोटक खेळी करुन रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेले. आता दक्षिण आफ्रिका 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजीचा कसा सामना करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या पहिल्या 8 खेळाडूंनी फलंदाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे रिंकूचा अपवाद वगळता इतर सर्व 7 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. भारताने या डावात चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावले. भारताच्या 8 फलंदाजांनी एकूण 19 षटकार आणि 15 चौकार लगावले.
कर्णधार सूर्यकुमारने ओपनर अभिषेक शर्मा याच्यासोबत संजू सॅमसनऐवजी इशान किशन येणार असल्याचं स्पष्ट केलं. इशानने या संधीचा फायदा घेतला. इशान आणि अभिषेक या दोघांनी भारताला वादळी सुरुवात करुन दिली. या दोघांनी अवघ्या 34 चेंडूत 80 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर इतरांना संधी मिळावी यासाठी इशान रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. इशानने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. इशानने फक्त 20 बॉलमध्ये 265 च्या स्ट्राईक रेटने 53 रन्स केल्या. इशानने या खेळीत 7 षटकार आणि 2 चौकार लगावले.
इशाननंतर तिलक वर्मा याने भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. तिलकने 19 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. अक्षर पटेल याने नाबाद 35 धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि कॅप्टन सूर्यकुमार या दोघांनी प्रत्येकी 30 धावा केल्या. अभिषेक शर्मा याने 24 धावांचं (रिटायर्ड हर्ट) योगदान दिलं. तर रिंकु सिंह याने 16 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, एनरिच नॉर्खिया, कॉर्बिन बॉश आणि क्वेना मफाका या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान भारतीय फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडलीय. आता गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.