6,6,6,6,6,6,6..! फक्त 9 चेंडूत इशान किशनचा अर्धशतकी तडका, प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सराव सामना सुरू आहे. या सामन्यात इशान किशनने सगळा राग काढला असंच दिसत आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मधून काढणं सोपं नाही हे स्पष्ट झालं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सराव सामने होत आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सराव सामन्यात तशी काही प्लेइंग 11 ठरलेली नसते. फलंदाज आणि गोलंदाजांना मिळेल तसा सराव करतो. एखाद्या खेळाडूची काम झालं की लगेच दुसऱ्या खेळाडूला पाठवलं जातं. असाच सराव सामना होत असतो. पण या सराव सामन्यात इशान किशनने कमाल केली. अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला उतरला आणि धूमधडाका केला. पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमक पवित्रा दाखवला. त्याने 20 चेंडूत अर्धशतक ठोकलं. पण त्याने यातही फक्त 9 चेंडूत शतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 7 षटकार आणि 2 चौकार मारले. नऊ चेंडूत मारलेल्या चौकार आणि षटकारांची बेरीज केली तर 50 होते. या खेळीनंतर इशान किशन तंबूत परतला. पण या खेळीने त्याने प्लेइंग 11 मधील स्थान पक्कं केलं आहे.
इशान किशनने स्ट्राईकला होता आणि पहिलं षटक एनगिडी टाकत होता. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर दुसर्या चेंडूवर अवांतर धाव आली. इशानने मग भात्यातून अस्त्र काढलं आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. मग पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक स्वत:कडे ठेवली. मार्को यानसेनच्या चेंडूवर 1 धाव घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली पण निर्धाव गेला. शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पुन्हा स्ट्राईकला आला आणि षटकार मारला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढत स्ट्राईक बदलली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली पण निर्धाव गेला.
पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली आणि षटकार मारला. चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारला. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली पण निर्धाव गेला. त्यानंतरच्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं आणि तंबूत परतला. इशान किशनने 265च्या स्ट्राईक रेटने 20 चेंडूत 53 धावा केल्या आणि रिटायर्ड आऊट झाला. इशानच्या आक्रमक पवित्रा पाहून अभिषेक शर्माही आवाक् झाला. त्याची बॅट इशानच्या तुलनेत शांत दिसली. इशानच्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताने 8 व्या षटकातच 100 धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ पुरता बॅकफुटला गेला आहे.
