ज्यांचं वय 75 त्यांनी सत्ता त्याग करा, युवाशक्तीच्या हाती सत्ता द्या; संजय राऊतांचा टोला
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या युवाशक्तीवरील भाषणावर जोरदार टीका केली. ७५ वर्षांवरील नेत्यांनी सत्ता त्याग करून युवाशक्तीच्या हाती सूत्रे द्यावीत, असे राऊत म्हणाले. मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप करत, स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान अविस्मरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. महिला विधेयकाची अंमलबजावणी न झाल्याबद्दलही राऊतांनी प्रश्न विचारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून युवा शक्तीचे आभार मानले असतील तर मीही मोदींचे आभार मानतो. हा देश कायमच युवा शक्तीच्या माध्यमातून पुढे गेला आहे. त्यामुळे ज्यांचं वय 75 झालं आहे, त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता द्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी पतंप्रधानांच्या लालकिल्ल्यावरील भाषणावर हल्ला चढवला.
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना युवा शक्तीसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशाच्या विकासाची चावी तरुणाईच्या हातात असल्याचंही मोदींनी म्हटलं. त्यावरून राऊत यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. या देशाची जडणघडण आणि मोकळा श्वास घेण्याची संधी प्रत्येकवेळी युवा शक्तीने दिली आहे. भगत सिंगांसारखे तरूण फासावर गेले. जंतरमंतरवरच्या आंदोलनाने देशा भोवतीचा गळफास काढण्यासाठी आणि श्वास मोकळा घेण्यासाठी देशाला गदागदा हालवलं. त्यामुळे मोदींनी युवा शक्तीचे आभार मानले, असावेत. त्यामुळे मीही मोदींचे आभार मानतो. हा देश कायम युवाशक्तीच्या माध्यमातून पुढे गेला. त्यामुळे ज्यांचं वय 75 च्या पुढे आहे, त्यांनी सत्ता त्याग करून युवाशक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील, असं संजय राऊत म्हणाले.
मोदी खोटं बोलत आहेत
करोना आणि इतर संकटाच्या काळात विरोधकांनी देशात संकट आणि भीती निर्माण करण्याचं काम केल्याचा आरोप मोदींनी केला. मोदींच्या या विधानावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी खोटं बोलत आहेत. किमान स्वातंत्र्य दिनी तरी खोटं बोलू नये. आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. हजारो लाखो तरुणांनी त्यांचा पवित्र आत्मा देशासाठी बलिदान केला आहे. त्यांचं स्मरण करण्याचं सोडून मोदी असं विधान करत असतील तर आपलं दुर्देव आहे, असं राऊत यांनी म्हटलं.
काँग्रेस, डावे आणि समाजवादीच स्वातंत्र्य चळवळीत
मोदी ज्यांना विरोधक मानत आहेत, ते काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नसते तर मोदी कधीच पंतप्रधान म्हणून भाषण करू शकले नसते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जनसंघ आणि संघाचा कधीच सहभाग नव्हता. किंबहुना त्यांनी चलेजाव चळवळीला विरोध केला होता, असं इतिहास पुराव्यासह सांगतो. मोदींचा टीकेचा रोख काँग्रेसवर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करत आहेत. हे दुर्देवाने म्हणावे लागेल. काँग्रेसशी आमचे 100 मतभेद असतील. पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान कोणालाही हिरावून घेता येणार नाही. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य लढ्याच्या तळपत्या सूर्यावर कितीही थुंकण्याचा प्रयत्न केला तर आकाशातून स्वातंत्र्याचा सूर्य गर्जना करेल की या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस, समाजवादी आणि डावे होते, असंही त्यांनी सांगितलं.
महिला विधेयकाची अंमलबजावणी का नाही?
2023 साली संसदेत महिला विधेयक एकमताने मंजूर झालं. पंतप्रधानांना आवाहन आहे, 2023 मध्ये मंजूर झालेल्या बिलाची अंमलबजावणी का केली नाही? हे लालकिल्ल्यावरून सांगितलं असतं तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं, असं राऊत म्हणाले.
