
आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु झाली असली तरी सर्वांचं लक्ष हे 14 सप्टेंबरच्या सामन्याकडे आहे. कारण या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आमनेसामने आले. या दोघांना भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी काही प्रश्न विचारले गेले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाचा पहिल्यांदाच पाकिस्तानशी सामना होत आहे. सूर्यकुमार यादवला विचारलं की, पाकिस्तान विरुद्ध तुमचा संघ अधिक आक्रमक असेल का? तेव्हा सूर्यकुमारने सांगितलं की, आक्रमकतेशिवाय सामना खेळला जाऊच शतक नाही. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही मैदानात असतो तेव्हा आक्रमक बाणा असतोच. आक्रमक झाल्याशिवाय खेळ खेळला जाऊच शकत नाही. मी मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला कोणत्याच खेळाडूला काही सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येक खेळाडू वेगळा आहे.’
दुसरीकडे, हाच प्रश्न फिरवून पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा विचारला गेला. तेव्हा त्याने उत्तर दिलं की, प्रत्येक खेळाडूला बिनशर्त सूट दिली आहे. सलमान आगाने सांगितलं की, ‘जर कोणता खेळाडू मैदानात आक्रमक होऊ इच्छित असेल तर त्याचं स्वागत आहे. वेगवान गोलंदाज खासकरून आक्रमक असतात. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. त्यांच्यात कायम जोश असतो. मर्यादा पाळत सर्वकाही करत असाल तर माझ्याकडून कोणतीही अडचण नाही.’
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या आणखी एका प्रश्नाने क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सूर्यकुमार यादवला विचारलं की आशिया कप जेतेपदासाठी टीम इंडिया दावेदार दिसत आहे. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘कोण बोललं, मी तर असं काही ऐकलं नाही. बघा, तुमची तयारी चांगली आहे तर तु्म्ही मैदानात आत्मविश्वासाने उतरता. आम्ही खूप कालांतराने टी20 खेळत आहोत. पण आम्ही तीन चार दिवसापूर्वी आलो आहोत. येथे आम्ही एकत्र चांगला वेळ घालवला. मी या स्पर्धेसाठी तयार आहे.’ तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने सांगितलं की, ‘टी20 क्रिकेटमध्ये कोणीही फेव्हरेट नसतो. ज्या दिवशी मॅच असते त्या दिवशी तुम्ही चांगले खेळला तर काही षटकातच सामन्याचं रुप पालटतं.’