
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना यावर मोहोर लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सामन्याबाबत खलबतं सुरू होती. अखेर पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळण्यास तयार झाला आणि क्रीडाप्रेमींसाठी व्हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळाली. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होत आहे. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय सुपर 8 फेरीत स्थान पक्कं करणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. भारत-पाकिस्तान सामना होणाऱ्या कोलंबो स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल ते येथे जाणून घेऊया.
भारतीय संघाची बाजू कायम फलंदाजांवर अवलंबून आहे. पण कोलंबोची खेळपट्टी तशी नसेल. कारण ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणार असणार आहे. त्यामुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. कारण पाकिस्तानकडे चांगला फिरकीचा मारा आहे. तसेच भारताची गेल्या वर्षात फिरकीविरुद्ध खेळण्याची क्षमता कमकुवत झाली आहे. त्यामुळे ही खेळपट्टी भारतीय फलंदाजांसाठी कसोटी असणार आहे. भारताने या सामन्यात चांगली फलंदाजी केली तर विजय पक्का असणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करणं फायद्याचं ठरेल. पण दव फॅक्टरही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचा कस लागेल.
भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यत आठवेळा आमनेसामने आले आहेत. भारताने त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने एकच सामना जिंकला आहे. पाकिस्तानचा एकमेव विजय 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मिळवला होता. रेकॉर्ड जरी भारतीय संघाच्या बाजूने असला तरी कमी लेखून चालणार नाही. भारताला या सामन्यात रणनितीनुसार कामगिरी करावी लागेल. कारण खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी असणार आहे. यापूर्वी श्रीलंकेत खेळताना भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यामुळे भारताला काळजी घ्यावी लागेल.