
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील भारत दक्षिण अफ्रिका सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना दोन्ही संघांना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक विजय हा उपांत्य फेरीच्या मार्गावर ठेवणारा आहे. त्यामुळे विजयी चव चाखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना याच मैदानावर खेळला आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारताने या खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकूनही प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच दव फॅक्टरमध्ये गोलंदाजीचा अंदाज घेतला. त्यामुळे भारताला या खेळपट्टीबाबत बऱ्यापैकी माहिती आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा कस लागला होता. पण आता दक्षिण अफ्रिकन संघ आहे आणि चुका करून चालणार नाही. कारण भारताप्रमाणे दक्षिण अफ्रिकन संघही साखळी फेरीतील चारही सामने जिंकून येथे पोहोचला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर जोरदार फटकेबाजी होईल. मैदान मोठं असल्याने गॅप शोधून चौकार षटकारांची आतषबाजी करणं फलंदाजांना सोपं जाईल. त्यामुळे गोलंदाजांना या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना सावध राहावं लागेल. टप्पा टाकताना चूक केली की चेंडू थेट प्रेक्षकांकडे पोहोचलेला असेल. त्यामुळे या खेळपट्टीवर आव्हान गाठणं सोपं जाईल असंच दिसत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. पहिल्या डावात कमी धावांवर रोखून दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. दव फॅक्टरमुळे गोलंदाजांना दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं सोपं नसेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल तितकाच महत्त्वाचा असणार आहे.
अहमदाबादमध्ये आकाश निरभ्र असेल त्यामुळे पावसाची शक्यता नाही. त्यामुळे हा सामना विनाखंड सुरू होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि 7 वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. मैदान आणि आसपास तापमान 24 ते 29 डिग्री सेल्सियस असेल. तर आर्द्रता 40 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. एकंदरीत हे वातावरण खेळण्यासाठी उत्तम आहे.