MI vs LSG : मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचं कर्णधारपदावर भाष्य, म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत आता प्लेऑफच्या सामन्यांची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडू असूनही निराशाजनक कामगिरी राहिली आहे. हार्दिक पांड्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 13 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. आता हार्दिक पांड्याने आपल्या कर्णधारपदावर भाष्य केलं आहे.

MI vs LSG : मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचं कर्णधारपदावर भाष्य, म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 17, 2024 | 5:27 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्ससोबत खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर होत असलेला सामना केवळ औपचारिक आहे. कारण या आधीच मुंबईचा स्पर्धेतील गाशा गुंडाळला गेला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीसाठी चर्चेत असलेला पैलू म्हणजे कर्णधार हार्दिक पांड्या. गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून मुंबई इंडियन्सने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. हार्दिक पांड्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये अंतिम फेरीही गाठली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्या विश्वास टाकत कर्णधारपद सोपवलं होतं. मात्र तसं काही झालं नाही. त्याच्या विपरीत परिणाम या स्पर्धेत दिसून आले. मुंबई इंडियन्सला 13 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलेला पहिला संघ ठरला.

स्टार स्पोर्ट्सने एक्सवर पोस्ट केलेल्या कॅप्टन स्पीक सेगमेंटचा व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पांड्याने कर्णधारपदावर भाष्य केलं आहे. “माझी कर्णधारपदाची भूमिका सोपी आहे. हार्दिक पांड्या फक्त त्याच्या इतर 10 सहकाऱ्यांसोबत खेळत आहे. माझा मंत्र सोपा आहे. खेळाडूंची काळजी घेणे आणि त्यांना आत्मविश्वास देणे. त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि प्रेम दिलं तर ते नक्कीच मैदानात जाऊन 100हून अधिक टक्के देतील आणि मी हेच सांगत असतो.”, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

“मला निकालाने काही फरक पडत नाही, तर मी दृष्टीकोनात्मकपणे पुढे जाणारा आहे. आमचा दृष्टीकोन संघाला अनुकूल असेल तर जाहीरपणे त्याची मदत होते”, असंही हार्दिक पांड्या पुढे म्हणाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यानंतर कमबॅक करत 4 सामन्यात विजय मिळवला. मात्र त्यानंतर पराभवाची मालिका सुरुच राहिली आहे. हार्दिक पांड्याला मैदानात रोषालाही सामोरं जावं लागलं. पण वेळेनुसार परिस्थिती बदलत गेली. पण तिथपर्यंत मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं.

मुंबई इंडियन्स संघ: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, नमन धीर, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, हार्विक देसाई, जेराल्ड कोएत्झी, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, क्वेना मफाका.