MI vs LSG : पराभवानंतर हार्दिक पांड्याला अश्रू अनावर! सामन्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल

लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात सुपर जायंटस्ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 203 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 5 गडी गमावून फक्त 191 धावा करता आल्या. यासह मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव झाला.

MI vs LSG : पराभवानंतर हार्दिक पांड्याला अश्रू अनावर! सामन्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 05, 2025 | 3:47 PM

आयपीएल २०२५: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 18 व्या पर्वात मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास झालेली नाही. मुंबई इंडियन्सने आता खेळलेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. मागच्या सामन्यात कोलकाताविरुद्ध विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला यावेळीही विजयाची अपेक्षा होती. पण लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या सांघिक कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. पराभवानंतर बोलताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, या पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो. तसेच तिलक वर्मांच्या रिटायरमेंटचाही बचाव केला. पण सामन्यानंतरच्या मुलाखतीत हसतमुखाने उत्तर देणारा पांड्या नंतर भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.मु लाखतीदरम्यान हार्दिक पांड्याने आपल्या भावना दाबून प्रश्नांची उत्तरे दिली होती. पण मुलाखत संपताच हार्दिक पांड्या दूर उभा राहून चेहरा खाली ठेवून आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. यावेळी काढलेले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हार्दिक पांड्याने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात फक्त 5 सामन्यांमध्ये विजयाची चव चाखता आली आहे. मुंबईने उर्वरित सर्व 12 सामने गमावले आहेत. या पराभवांमुळे हार्दिक पांड्या आता निराश झाला आहे. सुरुवातीच्या पराभवामुळे स्पर्धेतील प्रवास आणखी किचकट होत आहे. याची जाणीन कर्णधार हार्दिक पांड्याला आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं तर विजयाची लय कायम ठेवणं गरजेचं आहे.

मुंबई इंडियन्सने सध्या 4 सामने खेळले आहेत. अजूनही या स्पर्धेतील 10 सामने खेळायचे आहेत. पुढील सामना घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होईल.

Follow Us